• Fri. Jun 5th, 2026

    Mumbai News: सल्लागाराने तीनदा पैसे वाढवले! मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या खर्चात 58 कोटींची वाढ; कामावर नगरसेवकांचे प्रश्नचिन्ह

    Mumbai News: सल्लागाराने तीनदा पैसे वाढवले! मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या खर्चात 58 कोटींची वाढ; कामावर नगरसेवकांचे प्रश्नचिन्ह

    Mrinal Tai Gore Flyover: 2019पासून गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार सुरू आहे. या कामाचा खर्च 2023पासून तीनवेळा वाढला आहे. त्यामुळे या कामावर नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग आला असून, पावसाळ्याआधी पूल खुला करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन आहे. मात्र या कामाचा खर्च ५८ कोटी रुपयांनी वाढून २५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. प्रकल्पखर्चात तीनदा वाढ झाल्याने सल्लागार आणि कंत्राटदार यांच्यात संगनमत दिसत असल्याचा आरोप करत, या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी बुधवारी स्थायी समिती बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी केली.

    2019मध्ये कामाला सुरुवात

    मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम २०१६मध्ये पूर्ण झाले. या पुलामुळे पश्चिमेकडील एस. व्ही रोडवरून पूर्वेला पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहोचणे सोपे झाले. यानंतर, या उड्डाणपुलाचे राम मंदिर रोड ते रिलीफ रोडपर्यंत एस. व्ही. रोडलगत विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाला मार्च २०१९पासून सुरुवात झाली. तेव्हा त्याचा खर्च १९० कोटी रु. होता. नंतर, तो २०९ कोटी रुपयांवर गेला. करोनाकाळात हे काम थांबले. २०२३मध्ये पुन्हा पुलाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव सादर केला. याचा खर्च २०९ कोटींवरून २४० कोटी रु. करण्यास मान्यता देण्यात आली. आता याच प्रकल्पाची किंमत २४८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.Maharashtra TimesMumbai Local: लोकल प्रवास वेगवान होणार! सरकारकडून 4 हजार कोटींची तरतूद; कर्जत-पनवेल मार्ग, कल्याण-बदलापूर, आसनगाव मार्गिकांचे नियोजन

    खर्चात वेळोवेळी बदल का?

    या खर्चाला स्थायी समिती बैठकीत आक्षेप घेण्यात आला. शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनी मार्च २०२३पासून तीनदा खर्च वाढल्याचे सांगितले. ‘नवीन पूल वाहतुकीसाठी पूर्ण खुला केला आहे का हे पाहणे गरजेचे आहे. पाहणी केल्यानंतरच अंदाज येईल,’ असे त्या म्हणाल्या. शिवसेना उबाठाचे यशोधर फणसे यांनीही, प्रकल्पाला आठ-नऊ वर्षे लागलीच कशी, असा प्रश्न करत कामाची पाहणी करण्याची मागणी केली. भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी ‘विस्तारित कामाचा आराखडा तसेच रेखाचित्रात बदल करण्यात आले. मग सल्लागाराने चुकीचे नियोजन केले होते का? खर्चात वेळोवेळी बदल झाले. यावरून सल्लागार आणि कंत्राटदारात संगनमत केल्याचे दिसते,’ असा आरोप केला.

    Maharashtra TimesMumbai Water Metro: मुंबईत ‘जल मेट्रो’ प्रकल्पाला वेग, मुख्यमंत्र्यांसमोर अहवाल सादर; तीन टप्प्यांत 340 किमी लांब जलवाहतुकीचे जाळे

    सल्लागाराने प्रकल्प किंमतीत वारंवार बदल केल्याचे स्पष्ट दिसते, असे काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनीही सांगितले. सर्वपक्षीय सदस्यांनी विस्तारीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी केली. भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनीही तीच मागणी केली. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीच्या सदस्यांची भेट होईपर्यंत विषय तहकूब करत असल्याचे सांगितले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा