सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असून, भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
असे राहिले मतांचे समीकरण
एकूण ६१ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत विजयी उमेदवारांना ३४ मते मिळाली. ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली होती. मतदानादरम्यान राजकीय समीकरणे वेगाने बदलली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची दोन मते भाजपच्या पारड्यात पडली, मात्र शिवसेना (शिंदे गट) चे दोन सदस्य तटस्थ राहिल्याने भाजपची गणिते बिघडली. परिणामी, महाविकास आघाडीने बहुमताचा आकडा गाठत विजय निश्चित केला.
प्रतिष्ठेची लढत आणि नेत्यांची रणनीती
ही निवडणूक प्रामुख्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील अशी रंगली होती. भाजपने सत्ता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र जयंत पाटील आणि तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी आखलेल्या रणनीतीपुढे भाजपला नमावे लागले.
Pune Accident : भल्या पहाटे वाहनांची जोरदार धडक, कारचा अक्षरश: चेंदामेंदा, तरुणाचा जागीच मृत्यू; पुण्यात भीषण अपघात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजयकाका पाटील, अजितराव घोरपडे आणि विलासराव जगताप यांनी महाविकास आघाडीची मोट बांधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, अजित पवार गटातील काही नेत्यांच्या मदतीने महाविकास आघाडीने जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ यशस्वीपणे पूर्ण केला.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद परिसरात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष केला. “जयंत पाटील आणि रोहित पाटील यांच्या नेतृत्वाचा हा विजय आहे,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
जिल्हा परिषदेतील या सत्तांतरामुळे सांगलीच्या ग्रामीण राजकारणात महाविकास आघाडीची पकड अधिक मजबूत झाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
