• Mon. Mar 16th, 2026
    Nagpur News : पाणी मागितल्याचा गैरसमज; ‘मुलं चोरणारी’ समजून वृद्ध महिलेला मारहाण, पोलिसांनी वाचवला जीव

    राज्यात सध्या मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा दावा सोशल मीडियावर सातत्याने केला जात आहे. पण मुलं चोरणारी महिला समजून नागपुरात एका 60 वर्षीय महिलेला जमावाकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने ही महिला पोलिसांमुळे बचावली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर शहरात सोशल मीडियावर पसरत असलेल्या मुलं चोरणाऱ्या टोळीच्या अफवेमुळे एक धक्कादायक घटना घडली आहे. हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील इसासनी परिसरात एका 60 वर्षीय वृद्ध महिलेला पिण्यासाठी पाणी मागितल्याचा गैरसमज होऊन मुलं चोरणारी समजण्यात आले आणि जमावाकडून तिच्यावर बेदम मारहाण करण्यात आली. सुदैवाने पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे त्या वृद्धेचा जीव जाता जाता वाचला.

    मिळालेल्या माहितीनुसार, 60 वर्षीय महिला आपल्या नेहमीच्या औषधांसाठी रुग्णालयात गेल्या होत्या. औषध घेऊन त्या घरी परत येत असताना दुपारच्या सुमारास त्यांना थकवा जाणवू लागला. तसेच रोजची औषध घेण्याची वेळ झाल्यामुळे त्या रस्त्याच्या कडेला थांबल्या. त्यावेळी जवळील एका घरासमोर एक लहान मुलगा खेळत होता. औषध घेण्यासाठी पाणी आवश्यक असल्याने त्यांनी त्या मुलाकडे पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र, त्या वृद्ध महिलेला मराठी आणि हिंदी भाषा नीट येत नसल्यामुळे त्या भोजपुरी भाषेत बोलत होत्या. त्यामुळे त्यांना आपली गोष्ट स्पष्टपणे सांगता आली नाही. भाषेच्या अडचणीमुळे परिस्थितीचा गैरसमज झाला आणि पुढे त्याचे गंभीर परिणाम दिसून आले.

    दरम्यान, त्याच ठिकाणी असलेल्या एका महिलेनं अचानक आरडाओरड करत त्या वृद्ध महिलेवर गंभीर आरोप केला. साठ वर्षीय महिला तिच्या लहान मुलीला एका बॅगमध्ये टाकून अपहरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्या महिलेनं मोठा गोंधळ घातला. तिच्या या आरोपामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.

    मराठी आणि हिंदी नीट बोलता येत नसल्यामुळे भोजपुरी भाषिक त्या वृद्ध महिलेला आपला बचाव करता आला नाही. आरोप करणाऱ्या महिलेनं संतापाच्या भरात त्या वृद्ध महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी घटनास्थळी जमलेल्या इतर लोकांनाही गैरसमज झाला आणि त्यांनीही त्या महिलेला मुलं चोरणाऱ्या टोळीतील सदस्य समजून मारहाण करण्यास प्रोत्साहन दिले.

    पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव

    दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून त्या वृद्ध महिलेची सुटका करून तिला सुरक्षितपणे पोलीस स्टेशनमध्ये नेले. पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केल्यानंतर तिच्या मुलाला आणि सुनेला बोलावण्यात आले. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि वृद्ध महिला निरपराध असल्याचे स्पष्ट झाले.

    नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या खोट्या आणि तथ्यहीन अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. याच अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा गैरसमजांना खतपाणी मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास स्वतः कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा