• Thu. Jun 11th, 2026
    उन्हाळ्याच्या सुट्टीत परदेशी सहलींना ब्रेक, कुटुंबांचं नियोजन फसलं, आखाती देशातील युद्धाचा खिशाला फटका

    Foreign Tours affected due to Iran Israel War : येत्या काळात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान तिकिटांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असा पर्यटन व्यावसायिकांचा अंदाज आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुलांच्या दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत आखाती देशांसह इतर देशांमध्ये सहलीची योजना आखणाऱ्या कुटुंबांसमोर आता प्रवास सुरक्षित तसेच विना-अडथळा पार पडेल याची खात्री नसल्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. परदेशवारीची तिकिटे रद्द करण्याचेही प्रयत्न होत आहेत. यासोबतच, नव्याने तिकीट नोंदणीचा विचार करणाऱ्यांसाठी जागाच उपलब्ध नसल्याची तसेच उपलब्ध असलेल्या एखाद-दुसऱ्या जागेसाठी लाखो रुपये मोजावे लागण्याची वेळ आली आहे. आखाती देशांमधील युद्धस्थितीमुळे हवाई क्षेत्रावर आलेल्या निर्बंधांचा विपरित परिणाम प्रवाशांवर होत आहे.

    कुटुंबीयांना चिंता

    विमान इंधनाच्या किमती वाढत आहेत. परिणामी येत्या काळात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान तिकिटांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असा पर्यटन व्यावसायिकांचा अंदाज आहे. यापेक्षा मोठी चिंता घरी किंवा नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचण्याची आहे, असे महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर्स असोसिएशनचे अध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी सांगितले. आखाती देशांमध्ये लोक अडकून पडले आहेत. पाच दिवसांनंतर काय स्थिती असेल हे सांगता येत नाही, सहलीला गेल्यावर परतीची परिस्थिती काय असेल हे सांगता येत नाही, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दुबई विमानतळ बंद असल्याने प्रवासी अतिरिक्त पैसे मोजून ओमानपर्यंत येऊन तिथून विमानाने येत आहेत. पश्चिम आशियायी देशांमधील पर्यटनाचे नियोजन रद्द करण्यात येत असून याचा युरोपमधील सहलींवरही परिणाम होत आहे.
    Maharashtra TimesSolapur Crime : बाथरुममध्ये सिगरेटची 18 थोटकं, खिशात मराठी चिठ्ठी, डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणाचं गूढ कायम

    ट्रॅव्हल कंपन्यांचं काय म्हणणं?

    मुंबईहून लंडन, अमेरिका, युरोपातील इतर देशांपर्यंत जाण्याचा प्रवास प्रचंड महागला असून इकॉनॉमी श्रेणीची तिकिटेच उपलब्ध नसल्याचे दिसते. प्रीमियम इकॉनॉमी, बिझनेस क्लासची तिकिटे चार ते पाच लाखांपर्यंत पोहोचलेली आहेत, अशी माहिती जैन ट्रॅव्हल्सचे राकेशकुमार पुनमिया यांनी दिली. काश्मीर हल्ला, मग एअर इंडियाचा अपघात, इंडिगोची समस्या आणि आता युद्ध यांमुळे पर्यटन क्षेत्रावर आणि हवाई वाहतूक क्षेत्रावरही सातत्याने विपरित परिणाम झाला. युद्ध लवकर थांबले नाही तर पर्यटनावर दूरगामी परिणाम होतील. करोनाकाळाप्रमाणे लहान पर्यटन व्यावसायिकांवर उद्योग बंद करण्याचीही वेळ येऊ शकते, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.
    Maharashtra TimesNashik Crime : इन्स्टावर ओळख, नाशकातील नववीच्या विद्यार्थिनीवर नदीकाठी दोघांचा अत्याचार, मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले

    तिकिटाच्या किमती ८५ हजारांच्या घरात

    सध्या पर्यटक आखाती देशांमध्ये थांबून मग पुढचे विमान पकडण्याचा विचारही करू शकत नाहीत. ते थेट नियोजित ठिकाणी पोहोचण्याला पसंती देत आहेत. यात प्रवासी भाडे दुप्पट किंवा त्याहून अधिक झाल्याचे दिसते. मुंबई-लंडन तिकीट सामान्य परिस्थितीत ५० हजारांपर्यंत मिळते, मात्र सध्या एका महिन्यानंतरच्या या तिकिटाच्या किमती ८५ हजारांच्या घरात गेल्याचे सिरस ट्रॅव्हल्सचे राजेश रतेरिया यांनी सांगितले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा