• Sat. Jun 6th, 2026
    Kolhapur Crime : रिक्षाचालकाला दगडाने ठेचून संपवलं; ओळख पटवणंही कठीण झालेलं, 24 तासांत कोल्हापुरात दुसरी भयानक घटना

    साईप्रसाद मेहंद्रकर, कोल्हापूर: कोल्हापूर शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता सोमवारी उघडकीस आलेल्या एका धक्कादायक खुनाच्या घटनेने कोल्हापूर शहर परिसरात खळबळ उडाली आहे. करवीर तालुक्यातील उचगाव पैकी मणेरमळा परिसरात रविवारी रात्री ही खुनाची घटना घडली. मणेरमळा रिक्षा स्टॉपचे माजी अध्यक्ष असलेले प्रशांत बाबुराव पंडित (वय 38, रा. महालक्ष्मीनगर, उजाळाइवाडी) यांचा दगडाने डोक्यावर आणि तोंडावर भीषण प्रहार करून हा खून करण्यात आला आहे. यादववाडीतील जय हनुमान मित्रमंडळाच्या खोलीमागे नग्नावस्थेतील त्यांचा चेंदामेंदा झालेला मृतदेह सोमवारी सकाळच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. राजारामपुरीतील खुनानंतर अवघ्या काही तासांत घडलेल्या या दुसऱ्या घटनेने कोल्हापूर शहर गुन्हेगारीच्या लाटेत सापडले आहे.

    गांधीनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री हल्लेखोरांनी पंडित यांच्यावर दगडाने हल्ला केला. मृतदेहावर गंभीर जखमांच्या खुणा असून, नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याने हे प्रकरण गूढ आहे. पंडित हे मणेरमळा रिक्षा स्टॉपचे माजी अध्यक्ष होते आणि रिक्षाचालक म्हणून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला असून, खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

    श्वानपथकासह तपास जोरदार

    घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करून पुरावे गोळा केले जात आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील संशयितांची चौकशी सुरू असून, हल्लेखोर अद्याप फरार आहेत.

    Jalgaon Crime : आजाराने मृत्यू, कागदावर मात्र अपघात; 50 लाखांच्या विम्यासाठी डॉक्टर-पोलीसांनीच रचला कट, 10 जणांवर गुन्हा

    पोलिस अधीक्षक कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार, वैयक्तिक वैर किंवा रिक्षा स्टॉपच्या राजकारणाशी संबंधित असण्याची शक्यता तपासली जात आहे. नागरिकांनी संशयास्पद माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

    सलग दोन खुनांनी शहर दहशतीत

    या घटनेपूर्वी रविवारी सायंकाळी राजारामपुरी मातंग वसाहतीत सख्ख्या भावाच्या हत्येचे प्रकरण घडले होते, ज्यात आरोपीला अटक झाली आहे. एकाच दिवशी घडलेल्या दोन खुनांनी कोल्हापूर शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, स्थानिक रिक्षाचालक आणि नागरिक सुरक्षा वाढवण्याची मागणी करत आहेत. शासनाने गुन्हे नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात करावीत, अशी मागणीही होत आहे.

    Maharashtra TimesPune Crime : ‘मला कट का मारलास?’, तरुणाचा पाठलाग करत जाब विचारला; महिलेने जीवघेणा हल्ला केला, तिघांवर गुन्हा

    दरम्यान पोलिस तपासात महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असून, लवकरच आरोपींना पकडले जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed