राज्यातील राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होत आहेत. यासाठी ४ पक्षांकडून ७ नावं जाहीर करण्यात आली आहेत. ७ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणूक बिनविरोध होईल. शिंदेसेनेकडून माजी खासदार आनंदराव अडसूळ, राहुल शेवाळे, संजय निरुपम, प्रवक्त्या शायना एनसी यांची नावं चर्चेत होती. मात्र या दिग्गजांना मागे टाकून ज्योती वाघमारे यांनी बाजी मारली. यानंतर अडसूळ यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली.
वरिष्ठांच्या मनात जे होतं, ते झालं. आता त्यावर अधिक बोलणं मला योग्य वाटत नाही, अशा शब्दांत आनंदराव अडसूळ यांनी मनातील खंत बोलून दाखवली. केंद्रीय मंत्री अमित शहांपासून अनेकांनी आश्वासनं दिली. राज्यपाल करणार असं सांगितलं. त्याला २ वर्षे लोटली. या कालावधीत १० राज्यपाल नियुक्त झाले. पण माझा नंबर लागला नाही, असं अडसूळ म्हणाले.
शेवटी मीच ऑफर दिली. राज्यपाल पदाचा विषय सोडा, तुमच्या कोट्यातून राज्यसभा तरी द्या. माझी मागणी काही चुकीची नव्हती. प्रत्येक वेळी हो हो म्हटलं जातं. पण होत काहीच नाही. त्यांनी दिलेलं नाही आणि भविष्यात देणारही नाहीत. हा माझा अनुभव आहे, अशा शब्दांत अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना अमित शहांसमोर बैठक झाली होती. तेव्हा लिखित प्रस्ताव दिला होता. अडसूळांना राज्यपालपद देऊ असं सांगितलं. पण ते काही दिलं नाही. राज्यपालपद मिळेना, तर किमान राज्यसभा तरी द्या म्हटलं. तर तेही नाही, अशा शब्दांत अडसूळ यांना त्यांची कैफियत मांडली. आपण पाच वेळा खासदार राहिलो. सहावेळा संसदरत्न पुरस्कार पटकावला, हे सांगायलाही अडसूळ विसरले नाहीत.
ज्योती वाघमारेंचं नाव आज आम्ही ऐकलं. त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याचं आज शेवटच्या क्षणी समजलं, असं अडसूळ म्हणाले. राज्यसभेसाठी तुम्ही यापुढेही पाठपुरावा करावा करणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर आता थांबलेलं नाही. जेव्हा वाटेल तेव्हा देतील. आतापर्यंत बराच पाठपुरावा केला, असं अडसूळ म्हणाले.