• Sat. Mar 7th, 2026
    Kolhapur News : लेकरासाठी 20 वर्ष वाट पाहिली, काळाने तिलाही हिरावलं; दोन वर्षीय चिमुकलीचा करुण अंत

    Kolhapur News : कोल्हापुरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण कोल्हापूर हळहळलं आहे. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

    कोल्हापूर शिरोळ दोन वर्षीय मुलीचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : फक्त 2 वर्षांची चिमुकली उकळत्या दुधाच्या भांड्यात पडून मृत्युमुखी पडल्याची मोठी घटना कोल्हापुरात घडली आहे. शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे 24 फेब्रुवारी रोजी हा दुर्दैवी अपघात घडला होता. यामध्ये दोन वर्षांची मंचरी ज्ञानेश्वर खोत ही बालिका उकळत्या दुधाच्या भांड्यात पडली होती. स्थानिक खासगी रुग्णालयात तिच्यावर तब्बल आठ दिवस उपचार सुरू होते. मात्र, 1 मार्च रोजी रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ग्रामदैवत श्री मंगरायासिद्ध यात्रेच्या उत्साहपूर्ण वातावरणात घडलेल्या या घटनेने तेरवाड, लाटवाडी आणि अब्दुललाट गावांमध्ये शोककळा पसरली असून, नातेवाईकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहायला मिळत आहे.

    नेमकं काय घडलं?

    तेरवाड येथे 23 फेब्रुवारीपासून ग्रामदैवत श्री. मंगरायासिद्ध महाराजांची वार्षिक यात्रा भक्तीभावाने सुरू झाली होती. या निमित्ताने लाटवाडी-अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील एक विवाहित महिला आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसोबत माहेरी यात्रा साजरी करण्यासाठी पाटील मळ्यात आली होती. घरात नैवेद्याच्या तयारीसाठी सर्वजण व्यस्त होते. 24 फेब्रुवारी रोजी दुपारी मंचरीची आई तिला दूधभात भरवत होती. त्यावेळी पाणी आणण्यासाठी आई स्वयंपाकघरात गेली. पण आईच्या पाठीमागे चिमुकली मंचरी देखील धावत गेली आणि तिथे ठेवलेल्या उकळत्या दुधाच्या मोठ्या भांड्यात पडली. भाजलेल्या अवस्थेत तिला प्राथमिक उपचारानंतर सांगलीतील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. अत्यंत चिंताजनक प्रकृती असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
    Maharashtra TimesSatara News : लोखंडी प्रवेशद्वार अंगावर कोसळलं, ऐन होळीला अडीच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मुळे दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर

    20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कन्यारत्न

    खोत दाम्पत्याच्या आयुष्यातील ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. ज्ञानेश्वर खोत आणि त्यांची पत्नी यांच्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाली होती. तब्बल 20 वर्षे अपत्याच्या प्रतीक्षेत असलेल्या या दाम्पत्याला अखेर दोन वर्षांपूर्वी मंचरी हे कन्यारत्न प्राप्त झाले होते. दोन वर्षांतच तिच्या येण्याने घर फुलून गेले होते, मात्र अवघ्या दोन वर्षांच्या आयुष्यात उकळत्या दुधातील अपघाताने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने आई-वडील, कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा