• Sat. Mar 7th, 2026
    Ahilyanagar Accident : मित्राला सोडून परतताना काळाची झडप, रस्ता क्रॉस करताना ट्रकने चिरडलं; बाईकवरच दोघांचा करुण अंत

    Ahilyanagar Accident News : अहिल्यानगरमधील शेवगावमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोघांचा मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    शेवगाव फालके कॉम्प्लेक्स अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगरमधील शेवगाव शहरातील मिरी रोडवरील फलके कॉम्प्लेक्ससमोर शनिवारी 28 फेब्रुवारी रोदी दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शेवगाव तालुका सुन्न झाला आहे. भर दुपारी मालवाहू ट्रकच्या मागील चाकाखाली दोन तरुण अक्षरशः चिरडले गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे 3.30 वाजण्याच्या सुमारास शेवगावहून नगरकडे निघालेल्या ट्रकसमोर ही दुर्घटना घडली. इंदिरानगर येथे मित्राला सोडून रस्ता ओलांडताना दोन्ही तरुणांचा तोल गेला आणि क्षणार्धात ते ट्रकच्या मागील चाकाखाली सापडले. अपघात इतका भीषण होता की एका तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाने खासगी रुग्णालयात नेत असतानाच प्राण सोडले.

    कुटुंबाचे आधारस्तंभ गेले

    या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे निखिल पठाडे (वय 25) आणि विनायक शिंदे (वय 26) अशी असून ते शेवगाव तालुक्यातील वरूर बुद्रुक येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघेही तरुण मेहनती आणि कुटुंबाचा आधारस्तंभ असल्याने त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.
    Maharashtra TimesIran vs Israel : मध्य पूर्वेतील युद्धाचा महाराष्ट्राला फटका, द्राक्ष-केळ्यांसह भाज्यांची कोट्यवधींची निर्यात ठप्प, शेतकरी हवालदिल

    पुढील तपास पोलीस करत आहेत

    अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. काही काळ वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन पंचनामा केला व परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, शहरातील वाढती वाहतूक, भरधाव ट्रक आणि निष्काळजीपणे रस्ता ओलांडणे यामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याची चर्चा नागरिकांतून व्यक्त होत आहे. वाहतुकीचे नियम पाळले असते तर दोन तरुणांचे जीव वाचले असते,अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून दिली जात आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे शेवगाव तालुक्यात शोकसागर उसळला असून पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत.
    Maharashtra TimesNashik News: नाशिकमध्ये तीन महिने ‘नो एन्ट्री’, सर्व खासगी बस थांबे रद्द; 29 रस्ते व 5 उड्डाणपुलांच्या कामांमुळे निर्णय

    बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय

    अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील रामवाडी येथे हनुमान मंदिरासमोर रविवारी (1 मार्च) रात्रीच्या सुमारास एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली आणि तपासाची चक्रे फिरवली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून, तरुणाची लोखंडी कत्ती, विटा आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा