• Fri. Mar 6th, 2026
    Jalna News: इराण–इस्रायल तणाव; जालन्यातील पाच पर्यटकांसह खासदार कल्याण काळे दुबईत अडकले, सरकारकडून समन्वय सुरू

    इराण-इस्रायल युद्धामुळे मध्यपूर्वेतील हवाई मार्ग बंद झाले असून जालन्याचे खासदार डॉ. कल्याणराव काळे दुबईत अडकले आहेत. त्यांच्यासोबत जालन्याचे ५ पर्यटकही तेथेच थांबले असून मायदेशी परतण्यासाठी उड्डाणांच्या प्रतीक्षेत आहेत.

    जालन्याचे खासदार कल्याणराव काळे दुबईत अडकले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे उड्डाणांवर निर्बंध लागू झाल्याने जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे सध्या तेथेच थांबले आहेत. आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांवर निर्बंध आल्याने अनेक उड्डाणे रद्द किंवा पुढे ढकलण्यात आली असून हजारो प्रवासी विविध ट्रान्झिट केंद्रांवर अडकले आहेत. काँग्रेसचे जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याणकाळे हे दोन दिवसांपूर्वी अधिकृत दौऱ्यावर परदेशात गेले होते. बदलत्या परिस्थितीत त्यांना दुबई येथे थांबावे लागले आहे. नियोजित परतीचे उड्डाण रद्द झाल्याने पुढील उपलब्ध उड्डाणाची ते प्रतीक्षा करत आहेत.

    पाच पर्यटकही अडकले

    जालना शहरातील इतर पाच पर्यटकही दुबई आणि अबुधाबी येथे अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. संबंधित प्रवाशांशी भारत सरकारकडून वेळोवेळी संपर्क साधला जात असून ते सध्या सुरक्षित स्थळी असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील इतर प्रवाशांनाही अशाच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे.

    हवाई मार्गांवर निर्बंध

    मध्यपूर्वेतील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपले हवाई मार्ग तात्पुरते बंद किंवा मर्यादित केले आहेत. परिणामी, विमान कंपन्यांनी उड्डाणांचे पुनर्नियोजन सुरू केले असून काही कंपन्यांनी तिकिटांचे रद्द किंवा बदल शुल्क शिथिल करण्याची घोषणा केली आहे. प्रवाशांनी अधिकृत संकेतस्थळांवरून अद्ययावत माहिती तपासावी, असे आवाहन विमान कंपन्यांकडून करण्यात आले आहे.

    Maharashtra TimesLunar Eclipse 2026: होळीच्या रंगातच वर्षातील पहिलं खग्रास चंद्रग्रहण, खगोलप्रेमींसाठी खास पर्वणी, श्रद्धा-शास्त्राचा संगम अनुभवण्याची संधी

    कार्यकर्त्यांमध्ये चिंता

    दरम्यान, जालना शहरासह संपूर्ण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थिती असलेल्या ठिकाणी ते अडकले असल्यामुळे सरकारने तातडीने योग्य ती उपाययोजना करून त्यांना लवकरात लवकर मायदेशी आणावे, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून करण्यात येत आहे.

    Maharashtra TimesThane News: मध्यपूर्वेतील परिस्थिती गंभीर, ठाणे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर; परदेशातील नागरिकांसाठी विशेष मदत कक्ष सुरू

    दरम्यान, इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाबद्दल सांगायच झाल्यास आता हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने चालले आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. त्याचा परिणाम भारतावर काय होणार याचाही विचार चर्चेमध्ये येतो आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा