• Sun. Jun 14th, 2026
    Mumbai Crime: आठवीतील विद्यार्थ्याची तलावात बॉडी; पोहताना बुडाल्याचा संशय, पण सत्य काही वेगळंच, तीन मित्र अटकेत

    Mumbai Crime: ​भांडूपमध्ये एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याच्याच वर्गातील तीन मुलांनी क्षुल्लक कारणातून हे कृत्य केलं. काय प्रकरण?

    आठवीतील मुलाची मित्रांकडून हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : इयत्ता आठवीतील मुलाची त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याची घटना भांडुपमध्ये उघडकीस आली आहे. सिद्धार्थ लोंढे (१४) असे या मृत मुलाचे नाव असून याप्रकरणी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालामुळे हत्येचे बिंग फुटले.

    भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशेत पाडा परिसरात सिद्धार्थ वास्तव्यास होता. २२ फेब्रुवारीला दुपारी तीनच्या सुमारास तो खेळायला जातो सांगून घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत सिद्धार्थ घरी न आल्याने पालकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. मात्र, कुठेच न सापडल्याने अखेर पालकांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास आणि शोध सुरू असतानाच मुलुंड पोलिसांच्या हद्दीमध्ये विहार तलावाजवळ २३ फेब्रुवारीला सिद्धार्थचा मृतदेह सापडला.

    Maharashtra TimesPOSH Audit : राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये 30 दिवसांत ‘पॉश ऑडिट’, अन्यथा कारवाई; महिला आयोगाचे निर्देश
    भांडुपमधील मुले विहार तलावात पोहण्यासाठी जातात, त्यानुसार पोहण्यासाठी गेला असता सिद्धार्थ बुडाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे पोलिसांनी प्रथम अपमृत्यूची नोंद केली. याचदरम्यान सिद्धार्थचा शवविच्छेदन अहवाल आला. त्यात सिद्धार्थच्या फुफ्फुस आणि पोटात पाणी नसल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याचबरोबर डोक्याच्या मागील बाजूस दुखापत आणि अंतर्गत रक्तस्राव झाल्याचेही अहवालात नमूद होते. यावरून पोलिसांनी नव्याने तपास सुरू केला.

    Maharashtra TimesMumbai Pune Expressway: अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ठप्प; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना कडक सूचना, SOP तयार होणार
    सिद्धार्थला त्याच्या एका मित्रासोबत शेवटचे पाहिल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. त्यानुसार या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आम्ही चौघे पोहायला गेलो होतो, त्यावेळेस सिद्धार्थ बुडाल्याचे तो सांगू लागला. इतर दोन मित्रांनीही चौकशीत हेच सांगितले. शवविच्छेदन अहवालानुसार हत्येचा संशय असल्याने पोलिसांनी तिघांची स्वतंत्रपणे चौकशी केली असता अखेर त्यांनी सिद्धार्थला मारून तलावात टाकल्याचे मान्य केले. सिद्धार्थच्या तीन अल्पवयीन मित्रांची रवानगी बालगृहात करण्यात आली आहे.

    दादागिरी करीत असल्याचे कारण
    सिद्धार्थ आमच्यावर कायम दादागिरी करायचा. त्याला इंगा दाखविण्यासाठी तलावाजवळ बोलावून मारहाण केली. मारहाणीत काठीचा मार डोक्यावर बसल्याने तो बेशुद्ध पडल्याची माहिती आरोपींनी तपासात दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा