Nagpur Katol blast: आज सकाळी 7 वाजता नागपूरमधील कटोल तालुक्यात एका भीषण स्फोटात 15 कामगारांचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळी स्फोटाचा मोठा आवाज
राऊळगाव लगतच्या येनवरा गावाजवळ एसबीएल एनर्जीचा प्रकल्प असून येथे डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह, कास्ट बूस्टर्स आणि सिस्मिक एक्सप्लोजिव्ह्सचे उत्पादन केले जाते. याच प्रकल्पातील एका युनिटमध्ये सकाळच्या सुमारास अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका प्रचंड होता की परिसरात मोठा आवाज घुमला आणि कारखान्याच्या काही भागांना आग लागली.
Ajit Pawar : अजितदादांचं विमान जमिनीवर आदळताच पायलटचे शेवटचे शब्द काय? AAIB च्या 22 पानी अहवालात माहिती समोर
अनेक कर्मचारी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली
घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेच्या वेळी विविध युनिटमध्ये 30 हून अधिक कामगार कार्यरत होते. स्फोटानंतर काही कर्मचारी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तत्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे आणि बचावकार्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. जखमी कामगारांना तातडीने उपचारासाठी नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत हलविण्यात आले आहे. गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींमध्ये बहुसंख्य महिला कामगारांचा समावेश असल्याचेही समोर आले आहे.
सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि कामगार संघटनांकडून कंपनीच्या सुरक्षितता उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कंपनीकडून सुरक्षिततेबाबत मोठे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही कामगारांना आवश्यक प्रशिक्षण न देता कामावर घेतले जात असल्याचाही आरोप पुढे आला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी स्फोटक साठवण किंवा उत्पादन प्रक्रियेदरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Mumbai News: लोखंडी सळई डोक्यात पडल्यानं पादचारी जखमी; परळमध्ये उन्नत मार्ग प्रकल्पाच्या कामादरम्यान दुर्घटना
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली असून तात्काळ मदत व बचावकार्य गतीमान करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी दिले. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत आणि जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
