• Fri. Mar 6th, 2026

    Bike Accident: सणादिवशीच दोन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर; नवे कपडे खरेदीसाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला, छ. संभाजीनगरमध्ये हळहळ

    Bike Accident: सणादिवशीच दोन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर; नवे कपडे खरेदीसाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला, छ. संभाजीनगरमध्ये हळहळ

    Chhatrapati Sambhajinagar News: तरुणांच्या दुचाकीला धडक देणारे वाहन आयशर ट्रक असून त्यामध्ये ऊसतोड मजूर प्रवास करत होते, असं प्रत्यक्षदर्शींकडून सांगितलं जात आहे.

    सणादिवशीच दोन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर; नवे कपडे खरेदीसाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: सणासुदीच्या काळात आनंदाचे वातावरण असतानाच वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. ईदनिमित्त नवीन कपडे खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन १९ वर्षांच्या तरुणांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालाय या घटनेमुळे संपूर्ण वैजापूरसह खंडाळा परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अरमान शरीफ शेख वय १९, आणि आयान रमजान शहा वय २० रा. खंडाळा वैजापूर असे मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत.

    या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अरमान शेख आणि आयान शहा हे दोघे मित्र आपल्या एका साथीदारासह दोन दुचाकीवरून २८ फेब्रुवारीला दुपारी ३ च्या सुमारास वैजापूरला निघाले होते. सणाचा उत्साह असल्याने हे तरुण आनंदाने कपडे खरेदीसाठी जात असताना खंडाळाजवळील जरूर फाटा येथे समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकींना जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की आयान शहा याचा जागीच मृत्यू झाला.

    रुग्णालयात नेण्यापूर्वीच मालवली प्राणज्योत

    अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ उपचारासाठी हलवले. अरमान शेख हा गंभीर जखमी असल्याने त्याला अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात नेले जात होते. मात्र दुर्दैवाने अर्ध्या रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. या अपघातात त्यांचा तिसरा साथीदार फैजल खान हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

    धडक देणारा ट्रक पसारप्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणांच्या दुचाकींना धडक देणारे वाहन एक आयशर ट्रक होते, ज्यामध्ये ऊसतोड मजूर प्रवास करत होते. अपघातानंतर हा ट्रकचालक वाहन न थांबवता सुसाट वेगाने निघून गेला. दोन तरुण मुलांचा असा अचानक आणि अकाली मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ईदचा आनंद साजरा करण्याऐवजी आता या कुटुंबांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा