Ajit Pawar Plane Crash: हा केवळ अपघात असेल आणि घातपात नसेल तर या प्रकरणी तक्रार नोंदवायला सरकारकडून अडथळे का आणले जात आहेत? यामुळेच काहीतरी काळेबेरे आहे, असा संशय निर्माण होत असल्याचंही ठाकरे म्हणाले.
अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी अधिक व्यापक आणि निष्पक्ष व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत रोहित पवार यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपशील मांडला. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राज ठाकरे यांनी एफआयआर नोंदवून घेण्यास टाळाटाळ होत असल्याबद्दल सरकारला प्रश्न केले.
‘अजित पवार धुक्यामुळे गेले की धोक्याने, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. लोकांच्या मनात पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय असून या प्रकरणी सरकारच संशयाची भुते नाचवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘सुनेत्रा पवार यांनी भूमिका मांडावी’
‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे’, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘अजित पवार हे त्यांचे पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघातासंदर्भात हा एफआयआर आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका मांडावी. तसेच रोहित पवार यांनी हा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात अधिवेशनात मांडावा आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करावा’, असा सल्ला मी दिल्याचे राज यांनी सांगितले.
