• Fri. Mar 6th, 2026
    Nashik Fire: येवल्यात प्लायवूड कंपनीला भीषण आग; संपूर्ण कंपनी जळून खाक, 12 कोटींच्या नुकसानीचा अंदाज

    Nashik Fire: पाच नगरपालिकांचे अग्निशमन बंब पहाटेपासून आग विझविण्याचे काम करीत होते. मात्र, आठ-नऊ तास झाले तरी आग धुमसतच होती.

    नाशिक आग दुर्घटना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, येवला : तालुक्यातील रायते शिवारातील रविदीप इंडस्ट्रीज या प्लायवूड दरवाजे तयार करणाऱ्या कंपनीला शुक्रवारी (दि. २७) पहाटे अकस्मात आग लागून संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. या आगीने मालक विष्णू खैरनार यांचे सुमारे १२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही वा कोणीही जखमी झाले नाही.

    रायते शिवारात दीड एकरात उभ्या असलेल्या रविदीप कंपनीला शुक्रवारी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास अकस्मात आग लागली. या भीषण आगीत कंपनीतील यंत्रसामुग्रीसह कच्चामाल, तयार माल, सोलर, हायड्रॉलिक ऑईल, फेविकॉल आदी सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. लोखंडी खांब आणि पत्रेही उष्णतेने पार वाकून गेले.

    Maharashtra TimesNashik Crime : ‘तू माझी नाही तर, कोणाचीच होऊ देणार नाही’; गर्लफ्रेंडच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली, नाशिकमध्ये बॉयफ्रेंडचा कारनामा
    घटनेच्या वेळी कंपनीतील एका कुटुंबासह ३५ कामगार (सर्व राहणारे बिहार राज्यातील) कंपनीच्या कामगार निवासस्थानात झोपलेले होते. पहाटे उठलेल्या मंतोष पासवान या कामगाराला आग लागल्याचे दिसताच त्याने तातडीने इतर कामगारांना उठवले. मालक विष्णू पुंजाजी खैरनार (रा. येवला) यांना घटनेची माहिती कळवून सर्व कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग वाढतच गेल्याने येवला, कोपरगाव, मनमाड, चांदवड, पिंपळगाव बसवंत येथील अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. दुपारपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरूच होते. दरम्यान, घटनेचा कामगार तलाठी आदित्य बावस्कर यांनी पंचनामा केला, तर शहर पोलिस निरीक्षक योगेश घोरपडे, मंत्री भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

    Maharashtra TimesDevendra Fadnavis : नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
    पहाटे साडेचार – पावणेपाचला उठलो असता कंपनीला आग लागल्याचे दिसले. तातडीने सर्व सहकारी कामगारांना उठवले. मालकांना फोन केला आणि आम्ही सर्वजण बादलीने पाणी आणून आग आटोक्यात आणत होतो. आग, वाढतच चालली होती. मग पाण्याची मोटार लावून पाणी मारले परंतु, आग अधिकच वाढत गेली. -मंतोष पासवान, कामगार

    चार वर्षांपूर्वी मोठ्या कष्टाने आणि कर्ज काढून उद्योग उभा केला होता. आगीमुळे सर्व मशिनरी, कच्चा व तयार माल जळून खाक झाला. साधारणतः १२ ते १५ कोटींचे नुकसान झाले आहे. – विष्णू खैरनार, कंपनी मालक

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा