Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल अनेक सवाल उपस्थित केले आहेत. आमदार रोहित पवारांच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
अपघात धुक्यानं झाला की धोक्यानं झाला, असा थेट प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. ‘विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत अजून काहीच समजलेलं नाही. सरकार एफआयआर का नोंदवू देत नाही?’ असा सवाल मनसे प्रमुखांनी उपस्थित केला. ‘एफआयआरबाबत सरकारने उत्तर दिलं पाहिजे. एफआयआरचा मुद्दा आमदारांनी अधिवेशनात मांडावा. शरद पवारांच्या खासदारांनी लोकसभेत याबद्दलचे प्रश्न उपस्थित करावेत’, असंही राज ठाकरे पुढे म्हणाले.
रोहित पवार तीन-तीन ठिकाणी एफआयआर नोंदवायला गेले. एकाही पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा एफआयआर नोंदवला गेला नाही. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एक अधिकारी त्यांचा एफआयआर लिहून घेत होता. तितक्यात तिथे डीसीपी आले. त्यांनी एफआयआर नोंदवून घेऊ नका, असं सांगितलं. अजित पवारांचा मृत्यू अपघातानं झाला असेल, त्यात घातपात नसेल, तर मग सरकार एफआयआर का नोंदवू देत नाही, असा थेट सवाल राज यांनी उपस्थित केला.
साधा एफआयआर होऊ नये म्हणून सरकार दबाव का टाकतंय, सुनेत्रा वहिनी त्याच सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनीही याबद्दल बोलायला हवं. तीन-तीन पोलीस स्टेशनात जाऊनही एफआयआर घेतला जात नाही. इथेच संशयाची सुई आहे. या सगळ्यामुळे लोकांच्या मनात शंका आहेत. अपघाताला महिना होत आला तरीही अद्याप प्राथमिक अहवाल आलेला नाही, याकडेही राज ठाकरेंनी लक्ष वेधलं.
सीबीआय, सीआयडी सगळ्या गोष्टी सोडा. सरकार या प्रकरणात एफआयआर का नोंदवू देत नाही, ते सांगा, असं राज ठाकरे म्हणाले. सरकार एका एफआयआरला इतकं का घाबरतंय, या प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं. सुनेत्रा पवारांनी या सगळ्यावर बोलायला हवं. त्यांचे पती या अपघातात गेले आहेत. याच प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील या सगळ्यावर बोलायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.
