• Sat. Mar 7th, 2026

    Konkan Ro-Ro Ferry: मुंबई-कोकण आता जलमार्गे, रो-रो फेरीमुळे 5-6 तासांत प्रवास; कुठून-कशी, किती असतील तिकिट दर?

    Konkan Ro-Ro Ferry: मुंबई-कोकण आता जलमार्गे, रो-रो फेरीमुळे 5-6 तासांत प्रवास; कुठून-कशी, किती असतील तिकिट दर?

    Mumbai-Vijaydurg Ro Ro Ferry: मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई ते कोकण प्रवास सोपा होणार आहे आणि प्रवासात वेळही वाचणार आहे.

    मुंबई: मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास आता सोपा होणार आहे. मुंबई ते विजयदुर्ग रो-रो फेरी लवकरच सुरु होणार आहे. यामुळे, मुंबई ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर पाच-सहा तासांवर येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून ही सेवा सुरु करण्यात येणार असून कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

    कधी सुरु होणार सेवा?

    ऑगस्ट 2025मध्ये मुंबई ते विजयदुर्ग रो-रो फेरी सुरु करण्याची घोषणा केली होती. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हे रखडले होते. आता सर्व अडचणी दूर झाल्या असून ही सेवा एका महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मार्च 2026पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. तसेच, काम होताच चाचणी फेऱ्या सुरु होतील. जर या फेऱ्या यशस्वी झाल्या तर एप्रिल 2026पर्यंत ही सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हाळ्यात मुंबईकरांना कोकणात जाण्यासाठी एक नवा पर्यायी मार्ग मिळणार आहे.Maharashtra TimesMumbai Local Update: ICFकडून पहिली 15-डब्यांची लोकल मुंबईमध्ये, 7500 प्रवासी क्षमता; वांद्रे, विरार, डहाणूसह कुठे धावणार?

    मुंबईतून गाडीने सिंधुदुर्गला पोहचण्यासाठी 10 ते 12 तास लागतात. त्यात सुट्टी आणि सणासुदीच्या काळात तर हा वेळ आणखी वाढतो. जलमार्गे प्रवास करताना निम्मा वेळ वाचणार आहे. तसेच वाहतूक कोंडीशिवाय सुलभ प्रवास होईल. मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून थेट कोकण किनारपट्टीवरील विजयदुर्ग अशी ही सेवा असेल. या मार्गावरील प्रवासी जेट्टीचं रुपांतर आता रो-रो जेट्टीमध्ये करण्यात आलं आहे. या रो-रो जेट्टीमुळे प्रवासी आपली स्वतःची चारचाकी व दुचाकी वाहनं घेऊन जाऊ शकतात. यासाठी सर्व सुविधा विजयदुर्ग आणि मुंबई टर्मिनलवर सुरु करण्यात आल्या आहेत.

    Maharashtra TimesKanjurmarg-Badlapur Metro: मेट्रो लाईन 14चं काम सरकारच्या हातात, 38 किमी मार्गावर 15 स्थानकं; बदलापूर, महापे, कांजुरमार्ग जोडणार मार्गिका

    कसे असतील तिकिट दर?

    या सेवेसाठी तिकिट दर अद्याप निश्चित केले नाही आहेत. परंतु, प्राथमिक अंदाजानुसार साधारणपणे 800 ते 1200 रुपये प्रति प्रवासी तिकिट दर असू शकतात. शिवाय दुचाक्यांसाठी 1000 रुपये तर चारचाकीसाठी 4500 ते 6000 रुपये इतके तिकिट दर असू शकतात. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे ऑगस्टमध्ये गणेशोत्सवाच्या काही दिवसांपूर्वी ही सेवा सुरु होणार होती. पण तांत्रिक अडचणींमुळे हे काम त्यावेळी पूर्ण झाले नाही. तेव्हापासून नागरिक या सेवेच्या प्रतीक्षेत आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा