• Wed. Sep 9th, 2026

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अनिवार्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Feb 11, 2026
एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अनिवार्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

मुंबई, दि.11 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे,  अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून, प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे.

या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून, लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे.

कोणाला मिळणार NCMC कार्ड?

या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे:

विद्यार्थी : शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.

ज्येष्ठ नागरिक व महिला : अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल.

दिव्यांग प्रवासी : UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड.

पुरस्कारार्थी व पत्रकार : स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण.

 कार्डची वैशिष्ट्ये  प्रवासात स्मार्ट सोय

१) किंमत: नवीन कार्ड १९९ रुपये (GST सह). जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत उपलब्ध.

२) वॉलेट मर्यादा: किमान १०० रुपये; ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज.

३) रिचार्ज सुविधा : ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज.

४) नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी ३००० हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत.

५) बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

एस.टी.चा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्ट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहासजमा होत आहेत. नव्या युगात, एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

0000

संजय ओरके/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed