• Fri. Mar 6th, 2026
    अजित दादांचा 27 तारखेला पदाबाबत शब्द, निधनानंतर घाणेरडं राजकारण, NCP महिला नेत्याचा दावा

    Contributed by: जयेश साबळेAuthored by: अनिश बेंद्रे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    Maharashtra Politics : दादांच्या दुर्दैवी निधनानंतर नाशिकमध्ये गटनेते निवडीवरून संशयास्पद हालचाली सुरू झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक : “दिवंगत नेते अजित पवार यांनी मला नाशिक महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता करण्याचा शब्द दिला होता, मात्र त्यांच्या निधनानंतर घाणेरडं राजकारण करण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सही शिक्क्यांचा गैरवापर करुन कोणीतरी बनावट पत्र बनवलं” असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या हेमलता पाटील यांनी केली आहे. अजित दादांनी मला शब्द दिला असताना सीमा ठाकरे गटनेत्या कशा झाल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

    हेमलता पाटील काय म्हणाल्या?

    “राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मला स्पष्ट म्हणाले की गटनेतेपदाबाबतचं पत्र मी दिलं नाही, ही स्कॅन कॉपी आहे, कुणाच्या तरी ऑफिसमधून हे पत्र गेलं असेल, दोन तारखेला जेव्हा मी मुंबई कार्यालयात गेले, तेव्हा प्रदेशाध्यक्ष म्हणाले की थोड्याच वेळात मी तुला गटनेते पदाचं पत्र देतो. जेव्हा प्रदेशाध्यक्ष म्हणतात, की मी पत्र दिलेलं नाही, मात्र शहराध्यक्षांकडे असं पत्र आहे, याअर्थी त्यांच्या पत्राची बनावट कॉपी कोणी छापली का, त्यांच्या जुन्या पत्रावर नाव छापून कोणी टाकलं का?” असे सवाल उपस्थित होत असल्याचं हेमलता पाटील म्हणाल्या.”२४ तारखेला सकाळी ८ वाजता मी अजित दादांना भेटले, त्यांना सगळं तौलानिक संख्याबळ सांगितलं. त्यावेळी दादांनी मला स्पष्ट सांगितलं की तुला गटनेतेपद देतो. १० वाजता तटकरे आल्यावर पुन्हा आम्ही चर्चा केली. त्यांच्यासमोरही दादांनी गटनेतेपदाबाबत सांगितलं” असा दावा हेमलता पाटील यांनी केला.

    “२७ तारखेला जी व्यक्ती मला म्हणते, की तुला गटनेता करणार, त्यांच्या निधनानंतर त्यांचं नाव पुढे करुन कोणी असं घाणेरडं राजकारण करत असेल, तर अजितदादांची कार्यकर्ती म्हणून माझा विरोध आहे” असंही हेमलता पाटील म्हणाल्या.
    Maharashtra TimesJay Pawar : Dad काश वेळ थांबली असती, तर मी… जय पवार यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, अजितदादांसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं…

    दादांच्या नावाने खोटे राजकारण

    “राजकारण हे माझ्यासाठी कधीही जगण्या-मरण्याचे साधन नव्हते. अजित दादांच्या शब्दाला जागत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण त्यांच्या पश्चात त्यांच्याच नावाने खोटे राजकारण केले जात असेल, तर ते मी सहन करणार नाही,” अशी रोखठोक भूमिका माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी मांडली आहे. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर दादांच्या आग्रहाखातर आणि त्यांनी दिलेल्या शब्दामुळे डॉ. हेमलता पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. दादांनी त्यांच्या सहा टर्मच्या अनुभवाचा सन्मान करत त्यांना गटनेते पदाची ग्वाही दिली होती. मात्र, दादांच्या दुर्दैवी निधनानंतर नाशिकमध्ये गटनेते निवडीवरून संशयास्पद हालचाली सुरू झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

    Ajit Pawar यांच्या मृत्यूबाबत Chhagan Bhujbal यांना संशय, ‘इथे विमान आलंस कसं काय?’

    दादांनी नेहमीच माझ्या कामाचे कौतुक केले आणि महापालिका निवडणुकीत पक्षाचे प्रामाणिक प्रतिनिधित्व हवे म्हणून मला निवडणूक लढवण्यास प्रवृत्त केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ३० तारखेला प्रदेशाध्यक्षांच्या स्वाक्षरीचे एक पत्र दाखवून दुसऱ्या व्यक्तीची गटनेते पदी निवड झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली असता त्यांनी असे कोणतेही अधिकृत पत्र दिले नसल्याचे डॉ. पाटील यांनी म्हटले आहे. दादांच्या मृत्यूच्या पश्चात त्यांच्या आडून कार्यकर्त्यांना हीन वागणूक देऊन आपला ‘पॉलिटिकल स्कोअर’ सेट करण्याची ही कोणाची प्रवृत्ती आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
    Maharashtra TimesNCP Reunion : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला थेट मोदींचा हिरवा कंदील? खळबळजनक दावे, सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रिपदाची चर्चा
    जोपर्यंत प्रदेशाध्यक्ष या प्रकरणावर स्पष्टीकरण देत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही गटात सहभागी न होता स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय डॉ. पाटील यांनी घेतला आहे. “कोणत्याही दबावाला बळी न पडता लोकांसाठी काम करणे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा