मुंबई
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यानच्या मेट्रो लाईन 8 ला अंतिम मंजुरी दिली आहे. सुमारे 35 किलोमीटर लांबीच्या या मेट्रो प्रकल्पामुळे मुंबई, नवी मुंबई आणि संपूर्ण एमएमआरमधील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. विशेषतः दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांदरम्यान थेट मेट्रो जोडणी होणार असल्याने विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर आहे. त्यापैकी जवळपास 9.25 किलोमीटरचा मार्ग भूमिगत, तर 24.636 किलोमीटर मार्ग उन्नत अर्थात एलिव्हेटेड असणार आहे. या मार्गावर एकूण 20 स्थानकं असतील. त्यामध्ये 6 स्थानकांचे मार्ग भूमिगत आणि 14 स्थानकांचे मार्ग उन्नत असतील. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) जंक्शनलाही ही मेट्रो जोडण्यात येणार असल्याने रेल्वे, मेट्रो आणि विमानसेवा यांचा उत्कृष्ट समन्वय साधला जाणार आहे.
मेट्रो – 8 या प्रकल्पासाठी 17 ते 18 हजार कोटी रुपयांचा खर्च येण्याची अपेक्षा आहे. मात्र, या खर्चाच्या तुलनेत इतर महत्त्वाचे फायदे होणार आहेत.
प्रवाशांच्या वेळेची बचत, इंधन खर्चात होणारी घट, प्रदूषणात कमी आणि वाहतूक कोंडीपासून सुटका असे फायदे प्रवाशांना होतील. सध्या रस्ते मार्गाने एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर जाण्यासाठी लागणारा वेळ या मेट्रो-8 मुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.या विमानतळाला १०० टक्के दी. बा. पाटील यांचच नाव असणार आहे, संजीव नाईकांचं ठाम मत!
मुंबई – नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो लाईन 8 हा केवळ वाहतूक प्रकल्प यामुळे या भागाचाही मोठा विकास होणार आहे. विमान प्रवासी, नोकरदार, व्यावसायिक तसंच सामान्य मुंबईकरांसाठी हा प्रकल्प ‘गेमचेंजर’ ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळण्याकडे संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.