रायगड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिबागमध्ये चौलच्या टेकाळकर आळीत एकटी वृद्ध महिला हेरून चोरांनी निर्घृण हत्या केली आहे. चोरांच्या या घटनेमुळे संपूर्ण अलिबाग तालुका हादरला आहे.
मंदा या गेल्या दहा वर्षांपासून टेकाळकर आळी येथील आपल्या माहेरच्या मालमत्तेची देखरेख करण्यासाठी त्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचे पती प्रमोद शांताराम म्हात्रे हे अलिबाग तालुक्यातील गुंजीस येथे वास्तव्यास आहेत. २८ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत पती-पत्नींमध्ये फोनवर संपर्क झाला होता. मात्र, सकाळी साडेदहा वाजल्यानंतर मंदा यांचा फोन लागत नसल्याने पती प्रमोद म्हात्रे यांना संशय आला.
दिवसभर संपर्क न झाल्याने रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास ते टेकाळकर आळी येथील घरी आले. घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा असल्याचे दिसताच त्यांना अनर्थाची शंका आली. घरात प्रवेश केल्यानंतर मंदा या किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. तातडीने तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे अधिकारी, श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांच्या प्राथमिक पाहणीत मृत महिलेच्या डाव्या कानाखाली जखम आढळून आली आहे. तर मानेच्या उजव्या बाजूला दोन वळ (खुणा) स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. त्यांच्या कानातील सोन्याच्या रिंगा आणि गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने काढून नेण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दागिने लुटताना झालेल्या झटापटीतच त्यांचा मृत्यू झाल्याचा ठोस संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ZP Election : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, ZP आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
या प्रकरणी फिर्यादी प्रमोद शांताराम म्हात्रे यांच्या तक्रारीवरून रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा गु.रजि. नं. १२/२०२६ अन्वये भा.न्या.सं. २०२३ चे कलम १०३ (१), ३११ व ३३१ (७) अंतर्गत नोंदविण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव करीत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पोलीस उपनिरीक्षक भैरू किसन जाधव, दीपक म्हशीळकर, मनीष ठाकूर, सिद्धेश म्हात्रे, कुंभार, सुग्रीव गव्हाणे आणि सुधीर पाटील यांनी तपासाला गती दिली आहे. एकटी वृद्ध महिला हेरून घरात घुसून तिचा खून करण्यात आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपींचा तातडीने शोध घ्यावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
