• Sun. Mar 8th, 2026

    Alibaug Crime : पत्नीला संपर्क होत नसल्याने प्रमोद माहेरी गेले अन् पायाखालची जमीन सरकली, अलिबाग हादरलं

    Alibaug Crime : पत्नीला संपर्क होत नसल्याने प्रमोद माहेरी गेले अन् पायाखालची जमीन सरकली, अलिबाग हादरलं

    रायगड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिबागमध्ये चौलच्या टेकाळकर आळीत एकटी वृद्ध महिला हेरून चोरांनी निर्घृण हत्या केली आहे. चोरांच्या या घटनेमुळे संपूर्ण अलिबाग तालुका हादरला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : दागिन्यांच्या हव्यासापोटी एकटी राहत असलेल्या वृद्ध महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना चौल ग्रामपंचायत हद्दीतील टेकाळकर आळी येथे उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मंदा प्रमोद म्हात्रे (वय ७०) असे मृत महिलेचे नाव आहे. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी दागिने हिसकावण्याच्या प्रयत्नात झालेल्या झटापटीत त्यांचा जीव घेतल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. ही घटना रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

    मंदा या गेल्या दहा वर्षांपासून टेकाळकर आळी येथील आपल्या माहेरच्या मालमत्तेची देखरेख करण्यासाठी त्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचे पती प्रमोद शांताराम म्हात्रे हे अलिबाग तालुक्यातील गुंजीस येथे वास्तव्यास आहेत. २८ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत पती-पत्नींमध्ये फोनवर संपर्क झाला होता. मात्र, सकाळी साडेदहा वाजल्यानंतर मंदा यांचा फोन लागत नसल्याने पती प्रमोद म्हात्रे यांना संशय आला.

    दिवसभर संपर्क न झाल्याने रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास ते टेकाळकर आळी येथील घरी आले. घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा असल्याचे दिसताच त्यांना अनर्थाची शंका आली. घरात प्रवेश केल्यानंतर मंदा या किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. तातडीने तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे अधिकारी, श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

    पोलिसांच्या प्राथमिक पाहणीत मृत महिलेच्या डाव्या कानाखाली जखम आढळून आली आहे. तर मानेच्या उजव्या बाजूला दोन वळ (खुणा) स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. त्यांच्या कानातील सोन्याच्या रिंगा आणि गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने काढून नेण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दागिने लुटताना झालेल्या झटापटीतच त्यांचा मृत्यू झाल्याचा ठोस संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
    Maharashtra TimesZP Election : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, ZP आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
    या प्रकरणी फिर्यादी प्रमोद शांताराम म्हात्रे यांच्या तक्रारीवरून रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा गु.रजि. नं. १२/२०२६ अन्वये भा.न्या.सं. २०२३ चे कलम १०३ (१), ३११ व ३३१ (७) अंतर्गत नोंदविण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव करीत आहेत.

    उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पोलीस उपनिरीक्षक भैरू किसन जाधव, दीपक म्हशीळकर, मनीष ठाकूर, सिद्धेश म्हात्रे, कुंभार, सुग्रीव गव्हाणे आणि सुधीर पाटील यांनी तपासाला गती दिली आहे. एकटी वृद्ध महिला हेरून घरात घुसून तिचा खून करण्यात आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपींचा तातडीने शोध घ्यावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा