• Fri. Aug 7th, 2026
    दोन दिवसांत मुंबई-पुण्यात पावसाची शक्यता, कोणत्या भागांना ‘यलो ॲलर्ट’? येत्या आठवड्यासाठी IMDचा अंदाज जाहीर

    Monsoon Update: हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार मान्सूनची प्रगती पुन्हा सुरू होणार असून २३ जूनपर्यंत राज्यात पावसाच्या सरी कोसळतील. सोमवारपासून मुंबई महानगर प्रदेशात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/पुणे/जळगाव: भारतीय हवामान विभागाने सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील रेंगाळलेले मान्सून आगमन २३ जूनपासून होऊ शकते, असे जाहीर केल्याने आता मंगळवारकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत. मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी पुन्हा एकदा अनुकूल स्थिती निर्माण होत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारपासून मुंबई, ठाणे येथे मेघगर्जनेसह पावसाचा ‘यलो ॲलर्ट’ दिला आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळणार की, हलका पाऊस पडून गेल्यावर उकाड्याची जाणीव अधिक तीव्र होणार, याकडे लक्ष आहे.

    उकाड्यापासून दिलासा मिळणार का?

    २३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राचा आणखी काही भाग, यासोबतच तेलंगण, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगडचा काही भाग येथे मान्सून दाखल होईल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवास हर्णे, सोलापूरपलीकडे सरकलेला नाही. वातावरणामध्ये आर्द्रता आहे, मात्र मान्सूनच्या वाऱ्यांना चालना मिळत नसल्याने आर्द्रतेमुळे आणि पावसाच्या अभावामुळे तापमान आणि उकाड्याची तीव्रता प्रचंड वाढलेली आहे. जूनचे २० दिवस उलटून गेले, तरी मान्सून पूर्वसरींनीही महाराष्ट्राला फारसा दिलासा दिलेला नाही. त्यामुळे मान्सून दाखल झाल्यावर तरी हा दिलासा मिळणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    भारतीय हवामान विभागाने गुरुवारी पुढील दोन आठवड्यांसाठीचे पूर्वानुमान जारी केले होते. यानुसार २५ जूनपर्यंत पावसाचा जोर फारसा वाढलेला नसेल. कोकणामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. हा जोर दक्षिण कोकणात अधिक असण्याची शक्यता आहे. २५ जून ते २ जुलै या कालावधीत महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. या काळात उत्तर कोकणातही २५ जूनपर्यंतच्या आठवड्यापेक्षा पावसाचा जोर अधिक असू शकेल. हा पाऊस त्या आठवड्याच्या सर्वसाधारण सरासरीपेक्षा कमी असेल, असाही अंदाज आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या विविध मॉडेलच्या सध्याच्या अंदाजानुसार सोमवारपासून मुंबई आणि पुण्यात पाऊस अनुभवता येईल, अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

    मान्सूनचे वारे

    प्रादेशिक हवामान विभागाने २२ ते २४ जून या कालावधीत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा यलो ॲलर्ट दिला आहे. या कालावधीत दोन्ही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकेल. मात्र मेघगर्जना, तसेच विजांचा कडकडाट होऊ शकतो, असे प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केले. रायगड आणि रत्नागिरीमध्येही हलका ते मध्यम पाऊस या कालावधीत पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये मात्र २३ आणि २४ जून रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

    पुण्यात मंगळवारपासून पावसाची शक्यता

    पुणे शहरात पुढील दोन दिवसांत तापमानात थोडी घट होणार असून, मंगळवारपासून मेघ गर्जनेसह पुण्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली. रविवारी मुख्यतः आकाश निरभ्र राहणार असून, दुपारनंतर ढगाळ राहणार आहे. जून महिन्याचे तीन आठवडे उलटले तरी पुण्यात पाऊस पडलेला नाही. उकाड्यापासून सुटका दूरच, दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके बसत आहेत. तापलेले वातावरण बदलण्यासाठी पुणेकरांना सध्या पावसाची प्रतीक्षा आहे.

    दरम्यान, शनिवारी सकाळी शहरात काही वेळ आकाश ढगाळ होते, वाराही सुटला होता, त्यामुळे आज पाऊस पडणार, अशी नागरिकांमध्ये चर्चाही झाली; पण दुपारी बारानंतर आकाश पुन्हा निरभ्र झाले आणि उन्हाची तीव्रता वाढली. दोन दिवसांच्या तुलनेत पुन्हा तापमानात वाढ होऊन सरासरीपेक्षा ६.३ अंशाने वाढून ३६.७ अंश सेल्सिअस कमाल आणि किमान तापमानात थोडी घट होऊन २३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. शहरात मंगळवारपासून वातावरणात बदल होणे अपेक्षित आहे. २३ ते २५ जून दरम्यान दुपारनंतर आकाश ढगाळ राहून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे.

    Maharashtra TimesMonsoon Update : पावसाने दडी मारली, देशभर हाहाकार; मान्सूनच्या विलंबामागे ‘सोमाली जेट’ हे कारण; आता फक्त ‘या’ तारखांवरच आशा

    उत्तर महाराष्ट्रात तब्बल ९० टक्केपावसाची तूट

    यंदा जून महिना संपत आला तरी उत्तर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय न झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या पाचही जिल्ह्यांमध्ये २० जूनपर्यंत तब्बल ४०९.७ मिमी (अंदाजे ४१० मिमी) पावसाची एकूण तूट नोंदवण्यात आली आहे. दरवर्षी या कालावधीत उत्तर महाराष्ट्रात एकूण ४५५.८ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र, यंदा अवघा ४६.१ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत तब्बल ९० टक्के पाऊस कमी झाल्याने उत्तर महाराष्ट्रावर चिंतेचे मळभ दाटले आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा