Maharashtra Weather Update Today : राज्यातील हवामानात सतत चढ-उतार होत असून हवामान खात्याने आता काही शहरात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
मुंबईसह राज्यातील काही भागात पुणे, नाशिक, निफाडमध्ये तापमानाचा पारा पुन्हा एकदा कमी झाला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईत कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 19 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
Maharashtra Weather : पुण्यात पुढील दोन दिवस ढगाळ हवामान; नाशिकसह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, पिकांचं मोठं नुकसान
जळगावमध्ये अवकाळीने पिकांचं नुकसान
जळगाव जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने दाणादाण उडवली. कृषी विभागाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, अनेक घरांची पडझड झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील आठ तालुक्यांत नुकसान झाले आहे.कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, चोपडा, रावेर, चाळीसगाव, जळगाव, मुक्ताईनगर, एरंडोल, पारोळा आणि धरणगाव या तालुक्यांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक आहे. इतर तालुक्यात देखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीत प्रामुख्याने मका, गहू, ज्वारी, कांदा आणि बाजरी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी काढणीला आलेली पिके जमिनीदोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले.
धुळ्यात अवकाळी पाऊस, आमदार काशीराम पावरांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली
पंचनामे युद्धपातळीवर
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व बाधित क्षेत्रांचे प्राथमिक अहवाल सादर करण्यात आले असून, नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष पंचनामे करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीचा अंतिम आकडा स्पष्ट होईल.
चोपडा तालुक्यात 57 गावांना अवकाळीचा तडाखा बसला असून, विरवाडे येथे सहा घरांची पडझड झाली. मुक्ताईनगरमध्ये 65 गावांत, पारोळ्यात 25 गावांत, धरणगावमध्ये 54 गावांत, चाळीसगाव तालुक्यात नऊ गावांत, एरंडोल तालुक्यात 16 गावांत पिकांचे नुकसान झाले.
जिल्ह्यातील नुकसान
चोपडा तालुक्यात 3728 हेक्टर, मुक्ताईनगर 5200, पारोळा 3200, धरणगाव 1207, चाळीसगाव 3130, एरंडोल 1147 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.
