Sharad Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघाती निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असू पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राज्यासह देशाच्या राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवार यांचे बोट धरूनच अजित पवार हे राजकारणात कार्यरत झाले होते. शरद पवारांच्या तालमीत तयार झालेल्या अजितदादांनी पुढे आपल्या तडफदार नेतृत्वाच्या जोरावर राज्यभर आपलं गारूड तयार केलं. मात्र आज सकाळी बारामती इथं विमान अपघातात त्यांचं दुर्दैवी निधन झालं. बारामतीकरांसाठी हा सहन न होणारा धक्का असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रोश करत आहेत. या दुर्दैवी घटनेनं पवार कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला असून अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी बारामतीच्या दिशेने धाव घेतली आहे.
जयंत पाटील गहिवरले
अजित पवार यांच्या निधनानंतर विविध राजकीय नेत्यांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय की, “राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे. अजितदादांच्या निधनाची बातमी ही अक्षरशः सुन्न करून टाकणारी आहे. अजितदादा आणि माझे गेल्या जवळपास ३५ ते ४० वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध होते प्रदीर्घकाळ आम्ही एकत्र काम केले. महाराष्ट्राच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला अजितदादा पवार यांच्याकडून अजून मोठ्या कार्याची अपेक्षा असतानाच अशा प्रकारे अजित दादांचे अपघाती निधन आम्हा सर्वांच्या राजकीय जीवनात एक कायमस्वरूपी पोकळी निर्माण करून गेलेले आहे. दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे जे नुकसान झाले आहे ते नुकसान कधीही भरून निघणार नाही,” अशा शब्दांत जयंत पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक सर्वाधिक उत्तम प्रशासक व एक अत्यंत मोठा लोकनेता महाराष्ट्राने कायमचा गमावला आहे. अजित दादांची उणीव कायम भासत राहील, असंही जयंत पाटील म्हणाले.
