• Thu. Mar 12th, 2026

    Ajit Pawar Death: लाडका पुतण्या गेला! शरद पवार पत्नीसह तातडीने बारामतीकडे रवाना; सुनेत्रा पवार-सुप्रिया सुळेही निघाल्या

    Ajit Pawar Death: लाडका पुतण्या गेला! शरद पवार पत्नीसह तातडीने बारामतीकडे रवाना; सुनेत्रा पवार-सुप्रिया सुळेही निघाल्या

    Sharad Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघाती निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असू पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    लाडका पुतण्या गेला! शरद पवार पत्नीसह तातडीने बारामतीकडे रवाना; सुनेत्रा पवार-सुप्रिया सुळेही निघाल्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानं बारामतीसह संपूर्ण राज्यावर शोककळा परसली आहे. पवार कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का असून कामानिमित्त मुंबई आणि दिल्लीत असलेल्या पवार कुटुंबातील सदस्यांनी ही धक्कादायक बातमी समजताच बारामतीकडे धाव घेतली आहे. संसदेच्या कामाकाजानिमित्त अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील नवी दिल्ली इथं होत्या. अजितदादांच्या निधनाचं काळीज पिळवटून टाकणारं वृत्त समजताच त्या दोघीही विमानाने तातडीने बारामतीकडे निघाल्या आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह मुंबई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानाहून रस्तेमार्गे बारामतीकडे रवाना झाले आहेत.

    राज्यासह देशाच्या राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवार यांचे बोट धरूनच अजित पवार हे राजकारणात कार्यरत झाले होते. शरद पवारांच्या तालमीत तयार झालेल्या अजितदादांनी पुढे आपल्या तडफदार नेतृत्वाच्या जोरावर राज्यभर आपलं गारूड तयार केलं. मात्र आज सकाळी बारामती इथं विमान अपघातात त्यांचं दुर्दैवी निधन झालं. बारामतीकरांसाठी हा सहन न होणारा धक्का असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रोश करत आहेत. या दुर्दैवी घटनेनं पवार कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला असून अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी बारामतीच्या दिशेने धाव घेतली आहे.

    जयंत पाटील गहिवरले

    अजित पवार यांच्या निधनानंतर विविध राजकीय नेत्यांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय की, “राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे. अजितदादांच्या निधनाची बातमी ही अक्षरशः सुन्न करून टाकणारी आहे. अजितदादा आणि माझे गेल्या जवळपास ३५ ते ४० वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध होते प्रदीर्घकाळ आम्ही एकत्र काम केले. महाराष्ट्राच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला अजितदादा पवार यांच्याकडून अजून मोठ्या कार्याची अपेक्षा असतानाच अशा प्रकारे अजित दादांचे अपघाती निधन आम्हा सर्वांच्या राजकीय जीवनात एक कायमस्वरूपी पोकळी निर्माण करून गेलेले आहे. दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे जे नुकसान झाले आहे ते नुकसान कधीही भरून निघणार नाही,” अशा शब्दांत जयंत पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे.

    दरम्यान, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक सर्वाधिक उत्तम प्रशासक व एक अत्यंत मोठा लोकनेता महाराष्ट्राने कायमचा गमावला आहे. अजित दादांची उणीव कायम भासत राहील, असंही जयंत पाटील म्हणाले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा