• Sun. Mar 15th, 2026

    माझा मोठा भाऊ गेल्याची भावना – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 28, 2026
    माझा मोठा भाऊ गेल्याची भावना – महासंवाद

    मुंबई दि.२८: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही होते. त्यांचं अकाली जाणं जीवाला चटका लावणारं आहे अशा भावपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

    उपमुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्र त्यांना दादा म्हणून ओळखायचा आणि ते तसे होते. त्यांच्याकडे ‘वेळ’ साधण्याचा अप्रतिम गुण होता.  त्यांच्या कामाचा झपाटा आणि निर्णयक्षमता आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे. मी केवळ सहकारी म्हणूनच नाही तरी मित्र म्हणून सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलुंना जवळून पाहिलं आहे.

    अजितदादांच्या स्पष्ट आणि नर्म विनोदी, मार्मिक कोपरखळ्यांची वैशिष्ट्ये सुद्धा सगळ्यांना आवडत.

    आमचं सरकार तीन पक्षांचे असले, तरीही निर्णय मात्र एकसंधपणे आणि एकजूटीने घेत आलो आहोत. विशेषतः अगदी प्रारंभीपासून राज्याची आर्थिक घडी चांगली बसावी यासाठी राज्याचा वित्तमंत्री म्हणून अजित दादांनी विकास कामांना खीळ बसू न देता अतिशय हातोटीने निर्णय घेतले.  राज्यातील अनेक पायाभूत विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी मी मुख्यमंत्री असतांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा इतर काही योजना असो, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून अजितदादा यांनी वेळोवेळी पाठबळच दिले.

    परखड आणि जिथल्या-तिथे निर्णय घेण्याची क्षमता म्हणून दादांचा महाराष्ट्राला परिचय होता. वित्तमंत्री म्हणून त्यांच्याकडे सगळ्याच खात्यांबाबत माहिती असायची. पण म्हणून त्यांनी कधी शिष्टाचाराची चौकट मोडली नाही. धोरणात्मक निर्णय जाहीर करतानाही त्यांनी कधी कुणाला अव्हेरल्याचे दिसत नाही. आपले म्हणणे ते सूस्पष्टपणे आणि अधिकारवाणीने मांडत. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा धोरणात्मक बैठका आणि विधिमंडळ सभागृहातही अनुभवायला आला.

    स्वप्नाळू सादरीकरण आणि केवळ सांगोवांगी गोष्टींपेक्षा ते व्यावहारिक गोष्टी पडताळून पहात. एखादी संकल्पना पुढे आली, की तिचा ते सर्वांबाजूंनी विचार करायला भाग पाडत. ती संकल्पना टिकेल कितपत, तिच्या भविष्यातील देखभालीची व्यवस्था इथपासून, ती लोकहिताची आहे का, कितीजणांसाठी ती उपयुक्त ठरणार आहे, अशा अनेक गोष्टींचा ते विचार करत.  ठोस आणि तडकपणे निर्णय घेत असल्याने विधिमंडळातील आमदार आणि मंत्रिमंडळातील होतकरू-तरूण मंत्र्यांनाही अजितदादांच्या कार्यशैलीबाबत, दैनंदिनीबाबत कुतूहल असायचे. त्यांनाही वेळप्रसंगी ठणकावयाला ज्येष्ठत्वाच्या नात्याने दादा मागे पुढे पाहत नसत. छोट्या-मोठ्या गोष्टींचाही लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा. आपल्या निर्णयाचा लोकांच्या जीवनावर कसा आणि काय परिणाम होतो, याचा अभ्यास करायला हवा असा त्यांचा आग्रह असायचा. त्यामागे चूका काढण्याची नव्हेतर, त्यांची पुनरावृत्ती होऊ नये याची तळमळ असायची.

    आज दादा आपल्यात नाहीत ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटी म्हणतात.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *