• Fri. Mar 6th, 2026

    Nashik News: ‘बाबासाहेबांच्या जयंतीत निळा शर्ट घालून मी…’; प्रकाश आंबेडकरांच्या अ‍ॅट्रॉसिटीच्या मागणीनंतर गिरिश महाजन म्हणतात…

    Nashik News: ‘बाबासाहेबांच्या जयंतीत निळा शर्ट घालून मी…’; प्रकाश आंबेडकरांच्या अ‍ॅट्रॉसिटीच्या मागणीनंतर गिरिश महाजन म्हणतात…

    Girish Mahajan reaction on Atrocity case demand: “तो प्रकार अनवधानाने घडला, मी बाबासाहेबांचा आदर करणारा कार्यकर्ता आहे,” असे स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजनांनी दिले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक: प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने नवा वाद उफाळला आहे. एका महिला वन अधिकाऱ्याने जाहीरपणे आक्षेप घेत, “संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात?” असा सवाल केल्याने कार्यक्रमात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी महाजनांविरोधात पोलीस तक्रारही दाखल झाली असून, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाजनांवर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

    गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

    या सर्व वादावर आणि प्रकाश आंबेडकरांच्या मागणीवर गिरीश महाजन यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. महाजन म्हणाले की, “आज घडलेल्या प्रकारामुळे मला खूप वाईट वाटले आहे. मी गेल्या ४० वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहे, पण आजवर कधीही असा प्रसंग आला नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलो असलो तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मी कायम आदरच केला आहे. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा मोठा पुतळा आम्हीच उभा केला. भाषणात नाव घेण्याचे अनवधानाने राहिले असेल, पण त्यावरून एवढा गदारोळ कशासाठी? मी याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.”

    अ‍ॅट्रॉसिटीच्या मागणीवर महाजन म्हणाले…

    प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या अ‍ॅट्रॉसिटी च्या मागणीवर बोलताना महाजन म्हणाले, “अ‍ॅट्रॉसिटी दाखल करा म्हणताय, पण कशासाठी? समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. मी मातंग समाज असो वा वाल्मिकी समाज, त्यांच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी होतो. लग्नांना जातो, दलित वस्तीत पंगती देतो आणि स्वतः त्यांच्यासोबत जेवायला बसतो. माझ्या ४० वर्षांच्या राजकीय प्रवासात मी निळा शर्ट घातला नाही किंवा समाजाचा सन्मान केला नाही, असे कधीच घडले नाही.”

    माधवी जाधव यांच्याबद्दल काय म्हणाले?

    कार्यक्रमात जाब विचारणाऱ्या महिला वनरक्षक माधवी जाधव यांच्याबद्दल बोलताना महाजन म्हणाले, “मला माहीत नाही त्या भगिनी कोण आहेत. भुसावळमध्येही विकासकामांसाठी मी कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जामनेरमध्ये सर्व नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य निवडून येतात, यात सर्व समाजाचा वाटा आहे. आम्ही शाम बडोदे यांना जळगावातून तिकीट दिले, हे आमचे सर्वसमावेशक राजकारण आहे” असं त्यांनी म्हटलं आहे..

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा