इंदापूर
इंदापुरात जर हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे एकत्र आले, आप्पासाहेब जगदाळे व इतर लोकांनी साथ दिली तर बिघडलं कुठं, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कन्हेरी येथील मारुती मंदिरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.
आरक्षणाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “आरक्षणाप्रमाणेच संधी दिलेली आहे, त्यापेक्षा बाहेर काहीच नाही.” उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की, “शेजारच्या माळशिरस तालुक्यात खाटीक समाज मागासवर्गीयामध्ये मोडतो आणि त्यांच्याकडे एससी सर्टिफिकेट आहे. 2019 मध्ये उत्तमराव जानकर पराभूत झाले, पण 2024 मध्ये ते निवडून आले.”
बारामतीतही उमेदवारी देताना खाटीक समाजातील उमेदवाराला संधी दिली, आणि त्यांच्याकडे वैध सर्टिफिकेट आहे, मग ते चुकीचं कसं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“बारामती नगरपरिषद निवडणुकीत सर्वसाधारण जागेवर मागासवर्गीय उमेदवार निवडून आणले गेले की नाही?” असा सवालही त्यांनी केला. “आज माझ्याकडे 40–42 आमदार आहेत. त्यामध्ये सर्व जातींच्या आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली आहे. हे सगळ्यांचं राज्य आहे,” असं अजित पवार म्हणाले.
बारामतीत 1967 पासून पवार साहेबांनी सर्व समाजांना संधी दिली असल्याचं सांगत, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही संधी दिली जाते. महिलांनाही संधी देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे,” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं