मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कल्याण-डोंबिवलीतील घडामोडींवर बोलताना त्यांनी शिंदेसेनेला पाठिंबा देण्यावर खंत व्यक्त केली.
राज्यात गेल्याच आठवड्यात महापालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यात दोन्ही ठाकरेंचे पक्ष युती करुन लढले. पण निकाल लागून अवघे पाच दिवस होत नाहीत तोवर मनसेनं कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेला पाठिंबा दिला. राज ठाकरेंना याची कल्पना देण्यात आली होती, असा दावा कल्याण ग्रामीणचे माजी आमदार आणि मनसेचे नेते राजू पाटील यांनी केला. तर शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी या सगळ्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या सर्व घटनाक्रमावर राज ठाकरे आज व्यक्त झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते.
आजची परिस्थिती पाहून बाळासाहेब ठाकरे आपल्यात असायला हवेत असं कधीकधी वाटतं. सध्या राज्यात गुलामांचा बाजार भरला आहे. राज्यात कुठेही जा. हीच परिस्थिती आहे. हे सगळं चित्र पाहून बाळासाहेब आज आपल्यात नाही, ते बरंच आहे, असं वाटून जातं. आज जर ते आपल्यात असते, तर ते किती व्यथित झाले असते. त्यांना किती त्रास झाला असता? राज्यात माणसांचे लिलाव सुरु आहेत, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सद्यस्थितीवर संताप व्यक्त केला.
कल्याण-डोंबिवलीत काय घडलं? त्याबद्दल मी उद्धवशी बोललो. शिसारी आली शिसारी. व्यथित झालो. काय चाललंय हे सगळं? कुठे नेतोय आपण हे सगळं? हे सर्व पाहून वाटतं, बरं झालं आज बाळासाहेब आज आपल्यात नाहीत ते. हा सगळा प्रकार ते पाहूच शकले नसते, असं राज ठाकरे म्हणाले. मी शिवसेनेतून बाहेर पडलो. माझ्या वेदना वेगळ्या होत्या. मी फक्त पक्ष सोडला नव्हता, घर सोडलं होतं. आता त्या गोष्टीला २० वर्षे होऊन गेली. या कालावधीत मला काही गोष्टी उमजल्या. उद्धवला काही गोष्टी उमगल्या. मग एकत्र आलो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
