‘बाळासाहेब १०० वर्षांनीच काय पण द्विशतकी वर्षातही स्मरणात राहतील! राज ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्षानिमित्त भावूक पोस्ट.
१०० वर्षांनंतरही कालातीत राहणारे व्यक्तिमत्व
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीलाच बाळासाहेबांच्या अफाट प्रभावाचा उल्लेख केला आहे. “इतिहासात जन्मशताब्दी अनेकांची साजरी होते, पण एखादी व्यक्ती हयात नसतानाही तिने प्रांताच्या राजकारणाला आकार देत राहणे हे दुर्मिळ आहे. बाळासाहेब १०० वर्षांनीच काय, पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षातही लोकांच्या स्मरणात राहतील,” अशी खात्री राज यांनी व्यक्त केली. मात्र, यावेळी बाळासाहेबांचे स्मरण करणारा मराठी माणूस हा खचलेला किंवा अन्याय सहन करणारा नसावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आजचे राजकारण आणि बाळासाहेबांची ‘फूटपट्टी’
आजच्या राजकारणातील घसरत्या स्तरावर राज यांनी बोट ठेवले आहे. ते म्हणतात, “आज निष्ठा आणि तत्वे सहज विकली जातात. राजकारण पूर्ण व्यवहारी झाले आहे. निवडणुकीतल्या क्लुप्त्यांवर यश मोजले जाते. बाळासाहेबांच्या काळात अशा अपेक्षांच्या फूटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्यांनी त्या झुगारून दिल्या असत्या. त्यांना सत्तेचे अप्रूप नव्हते, पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेवर बसवण्याचे समाधान त्यांना मोठे होते.”
मुंबईचा महापौर कोण? भाजपचं ठरलं? ‘उत्तर’मधून प्रश्न सुटणार; माजी हॉकीपटूसह 6 जणींची नावं चर्चेत
“लवचिक भूमिका घेतली तरी ती स्वार्थासाठी नसेल”
राजकारणातील बदलत्या समीकरणांवर भाष्य करताना राज यांनी एक महत्त्वाचा शब्द दिला आहे. ते म्हणतात, “राजकारणात कधीतरी बाळासाहेबांनाही लवचिक भूमिका घ्यावी लागली, पण त्यांच्या मराठी प्रेमात तसूभरही फरक पडला नाही. मी पुन्हा शब्द देतो की, बदललेल्या राजकारणात कधी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल.”
मराठी माणसासाठी दिला शब्द
बाळासाहेबांनी मराठी भाषेसाठी आणि माणसासाठी जो लढा उभारला, तो धगधगत ठेवण्याची जबाबदारी पुढच्या पिढ्यांची असल्याचे राज यांनी नमूद केले. “बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा कधीही कमी होणार नाही. हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
