बीडमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहून शाळेतील व्यथा मांडली आहे.
कागदावर ‘प्रोजेक्टर’ पण शाळेत पिण्याचं पाणीही नाही!
अंकिताने आपल्या पत्रात शाळेतील दुरावस्थेचा पाढाच वाचला आहे. “शाळेत पिण्याचे स्वच्छ पाणी नाही, स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे, तर वर्गखोल्यांमध्ये बसण्याची सोय नाही,” असे तिने नमूद केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री शाळेत खेळाचे साहित्य, वॉटर फिल्टर, आणि प्रोजेक्टर सारख्या आधुनिक सुविधा दाखवण्यात आल्या आहेत, मात्र प्रत्यक्षात या वस्तू गायब असल्याचा आरोप या चिमुरडीने केला आहे.
‘तिचं’ पत्र सोशल मीडियावर व्हायरल
अनपेक्षितपणे हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे आपली तक्रार मांडण्याची हिम्मत दाखवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, यामुळे स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Nagpur Crime: नागपुरात अडीच कोटींचा दरोडा! सीसीटीव्ही कॅमेरे झाकून घर साफ केले, मुलाच्या साखरपुड्यासाठी कुटुंब बाहेर अन् इकडे….
सरपंचांचे प्रत्युत्तर
या प्रकरणावर गावच्या महिला सरपंचांनी आपली बाजू मांडली आहे. “माझ्या गावातील मुलगी उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करते, हाच आमचा विकास आणि प्रगती आहे,” अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. शाळेतील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळताना त्यांनी सांगितले की, “आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.”
हक्कांसाठी उठलेला आवाज!
अंकिताच्या या पत्रामुळे व्यवस्थेविरुद्ध दाद मागणाऱ्या एका नव्या पिढीचे दर्शन घडले आहे. जिल्हा परिषद शाळांच्या नावाने येणारा सरकारी निधी जातो कुठे? असा सवाल आता पालक विचारत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार या पत्राची दखल घेऊन शाळेचा कायापालट करणार का? याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
