निवडणुकीत जय-परायज हा होत राहतो. पण या निकालाकडे खेळाडू वृत्तीने पाहणं अपेक्षित आहे. पण काही वेळेला निकालावरुन विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना दिल्या आहेत.
“मुंबईसह महाराष्ट्रात भाजपला आणि आमच्या महायुतीला जनतेने अभूतपूर्व असा कौल दिलेला आहे. जो विकासाचा अजेंडा आम्ही चालवत आहोत त्याला लोकांनी एकप्रकारे दिलेली पसंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दाखवलेला हा जनतेचा विश्वास आहे. एक अभूतपूर्व अशाप्रकारचे हे यश आहे, जे कदाचित यापूर्वी कोणत्याही पक्षाला मिळालं नसेल. असं यश आम्हाला मिळालं आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेचे अतिशय मनापासून आभार मानतो”, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
“मी नागपुरात आहे. हे माझे मतदारसंघ आहे. नागपुराच्या जनतेनेदेखील बहुमत दिलं आहे. त्यामुळे नागपूरकरांचे देखील आभार मानतो. या अभूतपूर्व विजयानंतर आम्ही कुठेही अतिआत्मविश्वासात जाणार नाहीत. कुठेही गर्वात जाणार नाहीत. ही जनतेनी ठाकलेली आमच्यावरील जबाबदारी आहे. ही जबाबदारी योग्यप्रकारे आम्हाला निभवायची आहे. पुढच्या काळातही आम्ही पारदर्शकपणे कारभार सांभाळण्याचा प्रयत्न करु”, असं फडणवीस यांनी सांगितलं.
“मुंबईच्या महापौराच्या चर्चेला पूर्णविराम आहे. कारण महायुतीला बहुमत मिळालं आहे. महायुतीचा मराठी आणि हिंदू महापौर बनेल. महाराष्ट्रात ब्रँड म्हणाल तो एकच होता तो म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. इतर कुणीही स्वत:ला ब्रँड समजू नये. मी असं म्हणेन की, आमच्या विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांनी साथ दिली आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नसती तर ही अवस्था कधीच झाली नसती”, असंदेखील देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं आहे.
“जिंकण्याचा आनंद आपण व्यक्त केला पाहिजे. पण कुठल्याही परिस्थितीत आपला आनंद हा कुणाला उन्माद वाटेल असा व्यक्त करु नये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, ठाकरे आणि राणे यांचा इतिहास आहे. त्यामुळे काही गोष्टी ते व्यक्त होतात तर त्याला पार्श्वभूमी आहे. विजयाचा उन्माद कुणीच करु नये. मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. इतका सुंदर विजय मिळाला आहे. त्यामुळे आनंद जरुर व्यक्त करा, पण त्यांचा उन्माद करु नका”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
