मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचे निकाल उद्या लागणार आहेत. एक्झिट पोलनुसार मुंबईत भाजप आणि शिंदेसेनेची युती सत्तेवर येण्याची शक्यता आहे. मात्र, वसई-विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडी आपली सत्ता कायम राखेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
एकीकडे ठाकरे मुंबईचा बालेकिल्ला गमावत असल्याचं एक्झिट पोलचे आकडे सांगत आहेत. तर वसई विरार महापालिकेतील सत्ता ठाकूर कुटुंब कायम राखतील, असा अंदाज आहे. विधानसभेला वसई-विरार पट्ट्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची अक्षरश: धूळधाण उडाली होती. २०१९ मध्ये बविआचे तीन आमदार निवडून आले होते. नालासोपारा, विरार, बोईसर अशा तीन जागा बविआनं जिंकल्या होत्या. या तिन्ही जागा बविआला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत गमवाव्या लागल्या.
BMC Exit Poll 2026: …तर महायुती काठावर थांबणार! ठाकरे बंधूंना सत्तेची किती संधी? काँटे की टक्कर दाखवणारी आकडेवारी
वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत एकूण ११५ प्रभाग येतात. महापालिकेत विधानसभेचे दोन मतदारसंघ येतात. हे दोन्ही मतदारसंघ २०२४ पर्यंत ठाकूर यांच्या बविआकडे होते. पण या दोन्ही मतदारसंघांमध्ये २०२४ मध्ये भाजपनं बाजी मारली. ठाकूर यांचा बालेकिल्ला ठाकूर यांनी भेदला. त्यानंतर भाजपनं इथे आक्रमकपणे पक्षविस्तार सुरु केला. मात्र तरीही बविआ सत्ता राखणार असं सामचा एक्झिट पोल सांगतो.
BMC Election Exit Poll: मुंबईत कोणाची सरशी? ठाकरे बंधू की महायुती? पहिला एक्झिट पोल समोर, बहुमत कोणाला?
सामच्या एक्झिट पोलनुसार बविआला ७२ जागांसह स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरु शकतो. त्यांना २७ जागा मिळू शकतात. ठाकरेसेनेला ७, शिंदेसेनेला ५, काँग्रेसला ३ आणि इतरांना १ जागा मिळण्याचा अंदाज आहे. २०१५ मध्ये वसई विरार महापालिकेची अखेरची निवडणूक झाली. तेव्हा बविआनं १०६ जागा जिंकल्या होत्या. यंदा त्यांना ७२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. बविआच्या ३४ जागा कमी होऊ शकतात. पण त्यांची सत्ता कायम राहताना दिसत आहे. २०१५ मध्ये भाजपला केवळ १ जागा मिळाली होती. यंदा भाजपला २७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजप मोठी मुसंडी मारत प्रमुख विरोधी पक्ष होताना दिसत आहे.
