Ahilyanagar News : अहिल्यानगर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्णव आपल्या मामाकडे गेलेला, संक्रांतीचा सण असल्यामुळे सगळे पतंग उडवायला गच्चीवर गेले पण पण वरती घात झाला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी फाटा परिसरात राहणारा अर्णव महेश व्यवहारे हा मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी कोपरगाव येथील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या ओंकार काळे मामाकडे आला होता. सणाच्या दिवशी सकाळी अर्णव आपला मित्र ऋषिकेश वाघमारे (वय १९, रा. कोपरगाव) आणि इतर काही मित्रांसोबत घराच्या गच्चीवर पतंग उडवण्याचा आनंद घेत होता. पतंग उडवण्यासाठी त्यांनी बाइंडिंग तारचा वापर केला. पतंग उडवत असताना अर्णवचे लक्ष नसताना घराशेजारून जाणाऱ्या हाय व्होल्टेज विद्युत वाहिनीचा त्याला स्पर्श झाला. हा धक्का इतका भीषण होता की, अर्णव जागीच कोसळला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला त्याचा मित्र ऋषिकेश वाघमारे हा देखील या विजेच्या धक्क्याने जखमी झाला आहे.
Ahilyanagar Crime: संडे स्पेशल कंदुरी मटणाचा जिगरी मित्रांचा बेत, एकत्र जेवले; अचानक एकाने काढला गावठी कट्टा अन्… अहिल्यानगरमध्ये खळबळ
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांनाही रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच अर्णवचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अर्णव हा सणासाठी पुण्याहून मोठ्या उत्साहाने आला होता, मात्र काही तासांतच त्याच्यावर काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जखमी ऋषिकेशवर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. सणाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे लक्ष्मीनगर परिसरासह संपूर्ण कोपरगाव शहरात शोककळा पसरली आहे.
