वसई फाटा येथे मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा प्रकार उघडकीस, नेमकं काय घडलं?
नेमकी घटना काय?
वसई-विरारमध्ये मतदानासाठी अवघे काही तास उरले असतानाच ठिकठिकाणी पैशांची उधळण सुरू असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी रात्री वसई फाटा परिसरात काही जणांकडून नागरिकांना पैशांची पाकिटे वाटली जात असल्याची माहिती बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळाली.
कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि एका इसमाला ताब्यात घेतले.
प्रचार संपला अन् मंत्री बावनकुळे वादाच्या भोवऱ्यात; नागपुरात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत तणाव, पोलिसांची मध्यस्थी, नेमकं काय घडलं?
नालासोपाऱ्यात १० लाखांची रोकड जप्त
दुसरीकडे, नालासोपारा पूर्वेतील पेल्हार परिसरात पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली. गस्त घालत असताना पोलिसांनी एका दुचाकीला थांबवण्याचा इशारा केला, मात्र दुचाकीस्वारांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले असता, दुचाकीच्या डिक्कीत पोलिसांना पैशांनी भरलेली गोणी सापडली.
या गोणीत तब्बल १० लाख रुपयांची रोकड आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी अमोल कसबे (३५) आणि हरिओम सहानी (२०) या दोघांविरुद्ध ‘बीएनएस १७३’ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
निवडणूक आयोगाकडे लक्ष
दरम्यान, शहरातील पूर्व पट्टा, आदिवासी पाडे आणि झोपडपट्ट्यांमध्ये मतदारांना लक्ष्मीदर्शन घडवून स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राजकीय वर्तुळात या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली असून आचारसंहितेचा सर्रास भंग होत असल्याचे चित्र आहे. “हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असून निवडणूक आयोगाने कडक पावले उचलावीत,” अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणांमुळे वसई-विरारमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून भरारी पथके अधिक सक्रिय झाली आहेत.
