• Sun. Jun 14th, 2026
    महायुतीची आणखी एक मोठी घोषणा, मुंबईतल्या महिलांना 5 लाखांचं बिनव्याजी कर्ज मिळणार
    मुंबई
    मुंबई महायुतीने बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्याचे मोठे आश्वासन महायुतीने दिले आहे, जेणेकरून महिला मतदारांना आकर्षित करता येईल. यासोबतच बेस्ट बसमध्ये महिलांना ५० टक्के सवलत, कचरामुक्त आणि प्रदूषणमुक्त मुंबई, तसेच रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मुंबईचे आश्वासनही देण्यात आले आहे. मराठी माणसांसाठी परवडणाऱ्या घरांच्या योजना आखण्याचे आश्वासनही या जाहीरनाम्यात समाविष्ट आहे.महायुतीने मुंबई मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. मराठी भाषा आणि मराठी माणसांसाठी अनेक योजना राबवण्याचे आश्वासन महायुतीने दिले आहे. ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा उचलून धरल्याने, त्याच मुद्द्याने त्यांना घेरण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे.

    विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या धर्तीवर, मुंबई पालिकेतही महिला मतांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीने एक मोठे आश्वासन दिले आहे. महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा महायुतीने केली आहे. महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा करण्यात आली आहे.

    प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या माध्यमातून मागील काळात मुंबईतील लाडक्या बहिणींना एक लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्यावेळी काही महिलांनी चांगले उद्योग सुरू केले आहेत. आता महापालिकेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पाच लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘भाजपा-महायुतीच्या वचननामा’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम, भाजपा-महायुतीचे प्रमुख नेते व इतर मान्यवर उपस्थित होते.

    मध्यमवर्गीय घरातील महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या बिनव्याजी कर्जाचे आश्वासन देण्यात आले आहे. महिला बिनव्याजी कर्जाच्या माध्यमातून आपला रोजगार उभा करू शकतात. स्वयंरोजगारातून समृद्धीकडे आणि लाडक्या बहिणींकडून लखपती दीदीकडे असा त्यांचा प्रवास आपण करणार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.

    मुंबई महापालिका निवडणुकीत महिलांची मते अतिशय निर्णायक ठरणार आहेत. त्यातही मध्यमवर्गीय घरातील महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या बिनव्याजी कर्जाचे आश्वासन दिल्याने त्यांचे मतपरिवर्तन होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महायुतीने मोठा डाव खेळल्याची चर्चा आहे.

    महिलांना बेस्टमध्ये ५० टक्के सवलतीत प्रवास, ही महायुतीची एक मोठी घोषणा आहे. महिलांना बेस्टमध्ये ५० टक्के सवलतीत प्रवास मिळेल. सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, पार्क आणि हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी सुरक्षा वाढविण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

    तसेच कचरामुक्त आणि प्रदूषणमुक्त मुंबईचे आश्वासनही देण्यात आले आहे. रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मुंबईचे आश्वासनही महायुतीने दिले आहे. त्याचप्रमाणे मराठी माणसाला परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठीच्या योजना आखण्यात येतील, अशी ग्वाही महायुतीने दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed