• Sat. Mar 7th, 2026
    Uddhav Thackeray: शिवाजी पार्कच्या सभेत उद्धव ठाकरेंनी काढला अजित पवारांचा विषय, म्हणाले, ‘तर… त्यांची माफी मागा’

    Uddhav–Raj Thackeray Rally Shivaji Park : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवाजी पार्कवर आज ऐतिहासिक ठाकरे युतीचा हुंकार पाहायला मिळाला. राज ठाकरे यांच्यानंतर भाषणाला उभे राहिलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर आक्रमक शब्दांत प्रहार केला. अजित पवारांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून ते मुंबई अदानींच्या घशात घालण्याच्या डावापर्यंत उद्धव ठाकरेंनी सडेतोड भाष्य केले.

    ‘अजित पवारांच्या पुराव्यांचं काय झालं?’

    उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरून फडणवीसांना कोंडीत पकडले. ते म्हणाले, “तुम्ही अजित पवारांवर आरोप करताना तुमच्याकडे पुराव्यांच्या गोण्या असल्याचं सांगितलं होतं. आता त्या पुराव्यांचं काय करायचं? ते जाळून टाकायचे का? जर त्या पुराव्यांमध्ये खरोखर दम असेल तर अजित पवारांना सत्तेतून हाकलून द्या आणि जर पुरावे नसतील तर जाहीरपणे त्यांची माफी मागा.”

    ‘फडणवीस हिंदू आहेत की नाही?’

    भाजपकडून हिंदू महापौर पदाचा प्रचार केला जात असल्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी बोचरा सवाल केला “आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार, पण भाजप म्हणतंय हिंदू महापौर. देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा माझा प्रश्न आहे. त्यांनी एकदा स्वतःचं डोकं आणि सर्टिफिकेट तपासून पाहावं,” असा टोला त्यांनी लगावला.

    Maharashtra TimesRaj Thackeray: ‘दुबार मतदार आला तर सकाळी 7 वाजताच त्याला फोडा’, राज ठाकरे शिवाजी पार्कात कडाडले

    राज ठाकरेंच्या आक्रमक भाषणाचा संदर्भ देत ते म्हणाले की, “जर एवढं बोलूनही डोक्याला तिडीक लागणार नसेल तर छत्रपतींचे नाव घेण्याची तुमची लायकी नाही.”

    ‘मोरारजी देसाई ‘नरराक्षक’ होता’

    संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण करून देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मुंबईसाठी १०७ हुतात्म्यांवर गोळ्या झाडण्याचा आदेश देणारा मोरारजी देसाई हा नरराक्षक गुजरातमध्ये जन्मला होता. तो देखील हिंदूच होता ना? त्यावेळी जनसंघ कुठे होता?”

    ‘मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा डाव’

    भाजपला मुंबई का हवी आहे, याचे कारण सांगताना उद्धव ठाकरेंनी खळबळजनक दावा केला. “त्यांना मुंबई अदानींच्या घशात घालायची आहे. सध्या मुंबईतील बांधकामांसाठी लागणारे ७० टक्के सिमेंट अदानींकडून घेतले जात आहे.

    मुंबईचे पुन्हा ‘बॉम्बे’ करण्याचे त्यांचे षडयंत्र आहे,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी यावेळी केला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा