Uddhav–Raj Thackeray Rally Shivaji Park : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
‘अजित पवारांच्या पुराव्यांचं काय झालं?’
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरून फडणवीसांना कोंडीत पकडले. ते म्हणाले, “तुम्ही अजित पवारांवर आरोप करताना तुमच्याकडे पुराव्यांच्या गोण्या असल्याचं सांगितलं होतं. आता त्या पुराव्यांचं काय करायचं? ते जाळून टाकायचे का? जर त्या पुराव्यांमध्ये खरोखर दम असेल तर अजित पवारांना सत्तेतून हाकलून द्या आणि जर पुरावे नसतील तर जाहीरपणे त्यांची माफी मागा.”
‘फडणवीस हिंदू आहेत की नाही?’
भाजपकडून हिंदू महापौर पदाचा प्रचार केला जात असल्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी बोचरा सवाल केला “आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार, पण भाजप म्हणतंय हिंदू महापौर. देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा माझा प्रश्न आहे. त्यांनी एकदा स्वतःचं डोकं आणि सर्टिफिकेट तपासून पाहावं,” असा टोला त्यांनी लगावला.
Raj Thackeray: ‘दुबार मतदार आला तर सकाळी 7 वाजताच त्याला फोडा’, राज ठाकरे शिवाजी पार्कात कडाडले
राज ठाकरेंच्या आक्रमक भाषणाचा संदर्भ देत ते म्हणाले की, “जर एवढं बोलूनही डोक्याला तिडीक लागणार नसेल तर छत्रपतींचे नाव घेण्याची तुमची लायकी नाही.”
‘मोरारजी देसाई ‘नरराक्षक’ होता’
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण करून देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मुंबईसाठी १०७ हुतात्म्यांवर गोळ्या झाडण्याचा आदेश देणारा मोरारजी देसाई हा नरराक्षक गुजरातमध्ये जन्मला होता. तो देखील हिंदूच होता ना? त्यावेळी जनसंघ कुठे होता?”
‘मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा डाव’
भाजपला मुंबई का हवी आहे, याचे कारण सांगताना उद्धव ठाकरेंनी खळबळजनक दावा केला. “त्यांना मुंबई अदानींच्या घशात घालायची आहे. सध्या मुंबईतील बांधकामांसाठी लागणारे ७० टक्के सिमेंट अदानींकडून घेतले जात आहे.
मुंबईचे पुन्हा ‘बॉम्बे’ करण्याचे त्यांचे षडयंत्र आहे,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी यावेळी केला आहे.
