• Fri. Mar 6th, 2026
    Uddhav Thackeray : ‘खरा मित्र तोच जो चुका दाखवतो’; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांबद्दल मोठं विधान

    उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘खरा मित्र’ संबोधत त्यांच्या चुका दाखवत राहणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याचवेळी…

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडू लागला असतानाच, राज्याच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या मैत्रीवर अत्यंत सूचक भाष्य केले आहे. “खरा मित्र तोच जो चुका दाखवून देतो आणि मी खऱ्या मित्रासारख्या फडणवीसांच्या चुका दाखवतच राहणार,” असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे युती तुटलेली असतानाही वैयक्तिक मैत्रीचे धागे कायम आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

    भाजपवर टीकेची झोड

    यावेळी मैत्रीचा उल्लेख केला असला तरी, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या धोरणांवर सडकून टीका केली. “मराठी मते फोडण्यासाठी भाजपला ‘शाह सेना’ तयार करावी लागली. मुंबई महानगरपालिकेच्या ९२ हजार कोटींच्या ठेवी यांनी मोडल्या असून ३ लाख कोटींचा घोटाळा केला आहे,” असा गंभीर आरोप ठाकरेंनी केला. फडणवीसांच्या जुन्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी सवाल केला की, “मुंबईच्या ठेवी चाटायच्या आहेत का, असं म्हणणारे फडणवीस आता यावर उत्तर देणार का?”

    मराठी अस्मिता आणि कोस्टल रोडचे श्रेय

    मुलाखतीत ठाकरेंनी स्पष्ट केले की, त्यांचा लढा मराठी विरुद्ध अमराठी असा नसून, मराठी माणसाला त्रास देणाऱ्यांविरोधात आहे. जे बिल्डर आहारावरून मराठी माणसाला घर नाकारतात, त्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. कोस्टल रोडच्या श्रेयावरूनही त्यांनी फडणवीसांना लक्ष्य केले. “जेव्हा मुंबईला फडणवीस माहित नव्हते, तेव्हा आम्ही कोस्टल रोडची संकल्पना मांडली, आता ते त्याचे श्रेय लाटत आहेत,” असे ते म्हणाले.

    Maharashtra Timesमोठी बातमी: ड्रग्जनंतर साताऱ्यात आता बनावट खतांचा कारखाना उद्ध्वस्त; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त, कारवाईतून गंभीर माहिती उघड

    राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर म्हणाले…

    राज्यातील बदलत्या समीकरणांवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला सोडून एकत्र येणार असतील, तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकतो. मात्र, ते एकत्र येऊन पुन्हा भाजपसोबत जाणार असतील, तर तो शरद पवारांचा निर्णय असेल.

    महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी एका बाजूला फडणवीसांना ‘मित्र’ संबोधणे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर प्रहार करणे, ही त्यांची दुहेरी रणनीती असल्याची चर्चाही आता राजकीय विश्लेषकांमधून चर्चेत येऊ लागली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा