सातारा जिल्ह्यात कृषी विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत संशयास्पद कारखान्यावर धाड टाकण्यात आली असून, याठिकाणी मोठी कारवाई झाली आहे.
कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाला काही दिवसांपुर्वी फलटण तालुक्यातील टाकळवाडी सोसायटीत बनावट खते आढळून आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाने सापळा रचला. बनावट खतांच्या अनुषंगाने गोपनीय चौकशी करत असताना वडूजमधील बनावट खत निर्मिती कारखान्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या कारखान्यावर धाड टाकली. त्याठिकाणी नामांकित कंपन्यांच्या नावाने तयार केलेली बनावट रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा साठा आढळून आला.
अनुदानित रासायनिक खतांपैकी पॅरादीप फॉस्फेट लि. कंपनीच्या डीएपी खताच्या ९० गोण्या, डीएपी खत तयार करण्यासाठीचा कच्चा माल, म्युरेट ऑफ पोटॅश खताच्या १५ गोण्या, नॅशनल ॲग्रो हायटेक कंपनीच्या नावाचे टन बोरिक ॲसिड, २० मेट्रीक टन इतके क्लोरोपायरीफॉस दाणेदार कीटकनाशक, ग्लायफोसेट एसएल या तण नाशकाच्या १ लिटरच्या ३८० बाटल्या, २०० लिटरच्या बॅरलमध्ये साठवलेले रासायनिक द्रव्य कारखान्याच्या गोदामात आढळून आले.
Crime News: लंडन रिटर्न लेकाचा सैतानी अवतार; प्रेयसीसाठी जन्मदात्या आईचाच जीव घेतला, अख्खं गाव हादरलं, नेमकी घटना काय?
याशिवाय झिंक फॉस्फेट, ॲल्युमिनियम फॉस्फाईड, जय किसान कंपनीच्या नावाच्या छापील रिकाम्या गोण्या, इंडियन पोटॅश कंपनीच्या २५० रिकाम्या गोण्या, इफको कंपनीच्या २०० रिकाम्या गोण्याही त्याठिकाणी सापडल्या. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संपुर्ण मुद्देमालाची किमत ३० लाखांहून अधिक असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.
बनावट खत निर्मितीचे मोठे रॅकेट पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती देखील कृषी विभागाला मिळाली आहे. त्यानुसार तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सातारा स्थानिक गुन्हे शाखा करत आहे. अशा पध्दतीने शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या दृष्टीने सातारा जिल्हा कृषी विभाग आणि पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.
जावळी तालुक्यातील ड्रग्ज निर्मिती कारखाना उध्दवस्त केल्यानंतर आता बनावट खत निर्मितीचा पर्दाफाश झाला आहे. त्याचे धागेदोरे कुठपर्यंत जातात, हे पाहणे महत्वाचे आहे.
