• Fri. Mar 6th, 2026
    Jalna Crime: खळबळजनक! जालन्यात 3 वर्षांच्या चिमुरड्याचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या धाकाने पळ काढत अपहरणकर्त्यांनी मुलाला शेतात टाकलं…

    चारचाकीतून अपहरण, नाकेबंदी आणि श्वानपथक… अवघ्या चार तासांत चिमुकला सापडल्याने गावात सुटकेचा श्वास

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना: जालना जिल्ह्यातील मार्डी गावात मंगळवारी दुपारी एका तीन वर्षांच्या निरागस बालकाचे चारचाकीतून आलेल्या अज्ञात आरोपींनी नाट्यमयरित्या अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, ग्रामस्थांची सतर्कता आणि पोलिसांनी लावलेली तगडी नाकेबंदी यामुळे घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी मुलाला शेतात टाकून पळ काढला. अवघ्या चार तासांच्या थरारानंतर चिमुरडा रूद्र सुखरूप आईच्या कुशीत विसावल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

    नेमकी घटना काय?

    मार्डी येथील संजय राऊत आणि आशा राऊत हे दांपत्य मंगळवारी दुपारी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांचा ३ वर्षांचा मुलगा रूद्र हा मार्डी-हस्तपोखरी रोडवरील एका किराणा दुकानासमोर खेळत होता. दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकीतून आलेल्या अज्ञात इसमांनी रूद्रला उचलून गाडीत टाकले आणि भरधाव वेगाने पसार झाले.

    एका महिलेची सतर्कता आणि पोलिसांचा ‘अॅक्शन मोड’

    हा प्रकार एका महिलेने पाहिला आणि तिने आरडाओरड करून ग्रामस्थांना गोळा केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावकऱ्यांनी तातडीने अंबड पोलिसांना कळवले आणि स्वतःही शोध सुरू केला. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्यासह पथकाने श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेतली.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Crime: घटस्फोटाच्या वादातून साडूचा काटा काढला; चौघांचं मोठं चक्रव्यूह, पोलिसांनाही हलक्यात घेतलं, 14 जिल्ह्यांत हुलकावणी, अखेर…

    पोलिसांचा मागावर अन् थरारक शेवट

    पोलिसांनी सर्व मुख्य रस्त्यांवर तात्काळ नाकेबंदी करून वाहन तपासणी सुरू केली. पोलीस आपल्या मागावर असल्याचे आणि गावातून बाहेर पडणे अशक्य असल्याचे लक्षात येताच, अपहरणकर्त्यांनी घाबरून रूद्रला रस्त्यालगतच्या एका शेतात सोडून दिले आणि गाडीसह धूम ठोकली. शोध सुरू असतानाच पोलीस आणि नातेवाईकांना रूद्र शेतात रडताना आढळला.

    आईच्या कुशीत विसावताच डोळे पाणावले

    अवघ्या चार तासांत पोलिसांनी रूद्रला सुखरूप शोधून त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. दीड वर्षांपूर्वी अंबडमधून बेपत्ता झालेल्या इकरा शेख या बालिकेचा अजूनही शोध लागलेला नाही, त्यामुळे रूद्रच्या अपहरणाने गावकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अनर्थ टळला.

    याप्रकरणी रात्री उशिरा अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा