महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी सोमवारी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, लोणावळ्याजवळील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम 98 टक्के पूर्ण झाले असून अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. “काम वेगाने सुरू आहे आणि 1 मे, महाराष्ट्र दिनी, हा रस्ता सुरू करण्याचे आमचे ठोस उद्दिष्ट आहे. उर्वरित कामावर बारकाईने लक्ष ठेवले जात असून सुरक्षितता आणि वेळापत्रक यांचे काटेकोर पालन केले जात आहे,” असे पाटील यांनी सांगितले.
Pune Railway: पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! 60 नवीन रेल्वे, नवे प्लॅटफॉर्म, टर्मिनलसह… कुठे-काय बदल होणार?
रविवारी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रकल्पस्थळाला भेट देऊन आढावा बैठक घेतली. सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीदरम्यान वरिष्ठ MSRDC अभियंते आणि कंत्राटदार उपस्थित होते.
पूलाचे काम 98 टक्के पूर्ण
हा प्रकल्प मूळतः डिसेंबर 2025 मध्ये खुला होणार होता. मात्र घाट विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यांमुळे कामात अनेकदा विलंब झाला. पावसाळ्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव काम थांबवावे लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मिसिंग लिंक प्रकल्पात दोन बोगदे आणि एक दरीपूल असे प्रमुख घटक आहेत. यामध्ये 8.9 किमी आणि 1.9 किमी लांबीचे दोन बोगदे तसेच 650 मीटर लांबीचा केबल-स्टे पूल समाविष्ट आहे. बोगद्यांचे काम पूर्ण झाले असून पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
Versova-Bandra Sea Link: 100 वर्ष टिकणार मुंबईतील हा सागरी सेतू, 120 मिनिटांचा प्रवास फक्त 15 मिनिटांत; कुठे-कसा बांधणार?
हा पूल जमिनीपासून सुमारे 180 मीटर उंचीवर उभारला जात असून, MSRDC कडून हाती घेतलेले हे आतापर्यंतचे सर्वात आव्हानात्मक अभियांत्रिकी काम मानले जात आहे. सुपर-स्ट्रक्चरच्या स्लॅब डेकसाठी आठ कँटिलिव्हर फॉर्म ट्रॅव्हलर्स (CFT) बसवण्यात आले आहेत. दररोज सुमारे 1,000 कामगार या ठिकाणी काम करत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
वैशिष्ट्ये काय?
हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर एक्स्प्रेसवेवरील सध्याच्या घाट विभागातील तीव्र वळणं आणि उतारांमुळे होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. सरळ आणि गुळगुळीत मार्गामुळे अपघातांचा धोका कमी होण्याची अपेक्षा आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 6,695 कोटी रुपये इतका आहे. नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये या प्रकल्पाबाबत मोठी उत्सुकता आहे.
लिहिलेलं पुसता येतं कोरलेलं नाही, रितेश देशमुखांचं रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर
या प्रकल्पात समाविष्ट असलेला 650 मीटर लांबीचा केबल-स्टे पूल भारतातील सर्वात उंच दरीपूल ठरणार आहे. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून या पुलाचे बांधकाम सुरू असून, या पुलावर 182 मीटर (597 फूट) उंच पायलन्स उभारले जात आहेत. हे पायलन्स वांद्रे–वरळी सी लिंकवरील 128 मीटर (413 फूट) उंच पायलन्सपेक्षा अधिक उंच असून, भारतीय रस्ते प्रकल्पांमधील आजवरचा सर्वात उंच पूल ठरणार आहे.
