• Sat. Mar 7th, 2026
    Pune News : आता बस अचानक बंद पडल्यास… एसटी बसबाबत परिवहनमंत्र्यांचा मोठा निर्णय, प्रवाशांना मोठा दिलासा

    ST Bus Update : एसटी बसबाबत परिवहन मंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय दिला असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसंच या नियमाची अंमलबजावणी न झाल्यास त्याबाबत तक्रारही करता येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये बिघाड झाल्यास अथवा अपघात झाल्यास प्रवाशांना त्याच तिकिटावर अन्य कोणत्याही एसटी बसमधून (साधी, निमआराम, वातानुकूलित, शिवशाही, ई-शिवाई किंवा शिवनेरी) विनाशुल्क व तातडीने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. या प्रवाशांकडून फरकाच्या पैशासाठी अडवणूक केल्यास अथवा प्रवेश नाकारल्यास कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    राज्यात एसटी महामंडळाच्या बसमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. एसटी ही खेडोपाडी पोहोचण्याचे साधन असल्यामुळे नागरिकांकडून एसटीच्या प्रवासाला प्राधान्य दिले जाते. त्यात आता एसटीकडून महिला, ज्येष्ठ नागरिक यांना तिकिटामध्ये सवलत दिली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे; पण एसटीच्या ताफ्यातील बस जुन्या झाल्या आहेत, तर काही बसची देखभाल-दुरुस्ती न केल्यामुळे त्या मार्गात अचानक बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत.
    Maharashtra TimesDadar Railway Station : दादर स्थानकात मोठा बदल होणार, गर्दी कमी करण्यासाठी ‘डेक’ उभारणार; रेल्वेचा मोठा निर्णय
    या वेळी प्रवाशांना एक तर ती बस दुरुस्त होईपर्यंत तिथेच थांबावे लागते. अन्यथा दुसऱ्या बसमधून प्रवास करावा लागतो; पण लालपरीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ई-शिवाई, शिवनेरी, शिवशाही अशा जास्त तिकीट असलेल्या बसमध्ये प्रवेश दिला जात नाही. प्रवेश दिला, तर त्यांच्याकडून तिकीटाच्या फरकाची रक्कम मागितली जाते. त्यावरून प्रवाशांची चिडचिड होते. त्यामुळे आता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अशा वेळी फरकाची रक्कम घेऊ नये; तसेच प्रवाशांना कोणत्याही बसमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, असे आदेश दिले आहेत.

    चालक-वाहकांना २०% प्रोत्साहन भत्ता; उत्पन्नवाढीसाठी ST महामंडळाची कल्पक योजना

    ‘अन्यथा तक्रार नोंदवावी’

    एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबत सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांकडून अधिकचा आकार आकारू नये. त्याच तिकिटावर उच्च श्रेणीच्या बसमध्ये देखील प्रवाशांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने हा प्रवाशांचा कायदेशीर हक्क मानला जात असून, त्याची अंमलबजावणी काटेकोर व्हावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीदेखील एशियाड, हिरकणी, शिवनेरी, शिवशाही किंवा ई-शिवाई बसमध्ये नियम असूनही प्रवेश नाकारला गेला, तर प्रवाशांनी आगारप्रमुख, वाहतूक नियंत्रक किंवा नियंत्रकांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा