निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महायुतीच्या प्रचाराला वेगळा रंग चढला आहे. पायाभूत सुविधा आणि भविष्यातील योजनांवरून देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे.
पुण्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी पुण्याच्या पायाभूत सुविधा आणि भविष्यातील ४४ हजार कोटींच्या ‘कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन’चा रोडमॅप पुणेकरांसमोर मांडला आहे.
पुणे मेट्रो आणि पाण्याची विषमता
“पुण्याच्या मेट्रोवर फक्त घोषणा झाल्या, पण ती पुढे जात नव्हती. आम्ही ठाम निर्णय घेतला आणि आज ३३ किलोमीटरचे नेटवर्क पूर्ण झाले आहे, २४ किलोमीटरचे अंतिम टप्प्यात आहे. पुण्यात पाणी वाटपात मोठी विषमता होती. काही भागात २४ तास, तर काही भागात फक्त एक तास पाणी मिळायचे. केंद्र आणि राज्याच्या मदतीने आम्ही २४ बाय ७ योजना सुरू केली, ज्यामुळे ही तफावत दूर होईल”, असं फडणवीस म्हणाले.
कासवाच्या गतीने चालणारे ट्रॅफिक आणि ९% रस्ते!
पुण्याच्या ट्रॅफिकवर बोलताना फडणवीस म्हणाले, “पुण्याची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे रस्ते. देशात सर्वात कमी म्हणजे फक्त ९% रस्ते पुण्यात आहेत. ३२% रस्त्यांवर ८०% ट्रॅफिकचा भार आहे. पीक अवरला महाराष्ट्रात सर्वात कमी वेग पुण्यात असतो. हे नियोजन कोणी केलं, हे मी सांगणार नाही, पण त्यांना आता एकदा आरसा पाहण्याची गरज आहे,” असा टोला त्यांनी नाव न घेता विरोधकांना लगावला.
२०३० चा मास्टर प्लॅन आणि ४४ हजार कोटींची गुंतवणूक
दरम्यान, फडणवीसांनी पुण्याच्या भविष्याबद्दल मोठी घोषणा केली. “आम्ही २०३० चा पुण्याचा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन तयार केला आहे. या अंतर्गत पुण्यात पायाभूत सुविधांसाठी ४४ हजार कोटी रुपये गुंतवले जातील. पुण्याचा ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी आणि उपनगरांना मुख्य शहराशी जोडण्यासाठी आमच्याकडे डेफिनेट व्हिजन आहे,” असं यावेळी फडणवीस म्हणाले आहेत.
‘पाणी’ पिले आणि टाळ्या पडल्या
सभेच्या दरम्यान पाणी पिताना फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी केली, “आज जरी मी येथे पाणी पीत असलो, तरी निवडणुकीत मात्र विरोधकांना पाणी पाजणार आहे” त्यांच्या या विधानावर उपस्थितांनी शिट्ट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
सांस्कृतिक नगरीची ओळख जपतानाच पुण्याचे आधुनिक ‘ग्लोबल’ शहरात रूपांतर करण्यासाठी महायुतीला साथ देण्याचे आवाहन करत फडणवीसांनी पुण्याच्या राजकीय मैदानात विकासाचा नवा रंग भरला आहे.
