Pune Politics: भाजपमधीलच एका प्रबळ नेत्याने जाणीवपूर्वक पंख छाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सदर नेत्याच्या समर्थकांनी केला असून, सातत्याने होणाऱ्या या अन्यायामुळेच आता त्यांनी हे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी शहर उपाध्यक्ष वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे हे पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. २५ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या अमराळे यांच्या या संभाव्य निर्णयामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी (प्रभाग १२) मध्ये बाळासाहेब अमराळे यांचा मोठा जनसंपर्क आहे. २०१२ च्या निवडणुकीत त्यांचा अत्यंत कमी मतांनी पराभव झाला होता, मात्र तेव्हापासून त्यांना सातत्याने उमेदवारीपासून दूर ठेवण्यात आल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. यंदाच्या निवडणुकीतही या प्रभागात पुरुष उमेदवाराऐवजी महिला आरक्षण टाकून अमराळे यांची संधी डावलण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. हा प्रकार भाजपमधीलच एका प्रबळ नेत्याने जाणीवपूर्वक केल्याचा आरोप अमराळे समर्थकांनी केला असून, सातत्याने होणाऱ्या या अन्यायामुळेच आता त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे.
अमराळे यांनी गेल्या अडीच दशकांत पुणे शहरात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. त्यांच्या या व्यक्तिगत ‘व्होट बँक’मुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असून, येत्या १० तारखेला हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. या संदर्भात बाळासाहेब अमराळे यांना विचारले असता, त्यांनी सध्या तरी सावध भूमिका घेतली आहे. “येत्या दोन दिवसांत मी माझी सविस्तर भूमिका आणि पुढील निर्णय जाहीर करेन,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जर अमराळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तर मतदानाच्या तोंडावर प्रभाग १२ मधील भाजपची गणिते पूर्णपणे बिघडू शकतात.
