• Fri. Mar 6th, 2026

    Satara News : महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती, मराठी भाषा वगळता अन्य कोणत्याही भाषेची सक्ती नाही; ९९ व्या साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

    Satara News : महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती, मराठी भाषा वगळता अन्य कोणत्याही भाषेची सक्ती नाही; ९९ व्या साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

    99th Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यात मराठी साहित्य संम्मेलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मराठीच सक्ती असल्याचं सांगितलं. इतर कोणत्याही भाषेची सक्ती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सातारा : पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या राज्य सरकारच्या आदेशाचे जोरदार पडसाद ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात शुक्रवारी उमटले. ‘महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीची नव्हे, तर फक्त मराठीची सक्ती हवी,’ अशी एकमुखी मागणी करून साहित्यिकांनी राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टीकास्त्र सोडले. ‘महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची असेल,’ असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यावर द्यावे लागले.

    महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि आणि मावळा फाउंडेशनच्या वतीने आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ख्यातनाम लेखिका, विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते झाले. ९९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.
    Maharashtra Times‘मी मुख्यमंत्री असताना साहित्यात राजकारण नाही, साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावे, पण…’ फडणवीसांचे वक्तव्य चर्चेत

    ‘मावशीचे कोडकौतुक नको’

    ‘मायमराठीची अवहेलना होत असताना मावशीचे कोडकौतुक सहन करू शकत नाही. महाराष्ट्रात मराठी भाषेचीच सक्ती असायला हवी. नव्या शैक्षणिक धोरणाशी विसंगत हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने कायमचा रद्द करावा,’ अशी मागणी प्रा. जोशी यांनी केली. ‘यापुढील काळात मराठी भाषा आणि साहित्य विकसित करण्यासाठी आताच्या पिढीचा पाया मजबूत करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण काही करणार आहोत का, असा सवाल करून भवाळकर यांनी ‘लहान वयात मुलांवर अनेक भाषांचे दडपण नको,’ अशा कानपिचक्या दिल्या.
    Maharashtra Timesमोठी बातमी: साताऱ्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार, संमेलनापूर्वीच उफाळला मोठा वाद!
    त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ‘महाराष्ट्रात केवळ मराठीची सक्ती असेल,’ असा खुलासा केला. ‘महाराष्ट्रात मराठी भाषा वगळता अन्य कोणत्याही भाषेची सक्ती नाही. कोणत्या वर्गापासून अन्य भाषा शिकवायची याचा विचार करण्यासाठी नेमलेल्या डॉ. नरेंद्र जाधव समितीचा अहवाल अंतिम टप्प्यामध्ये आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीला आता भारतात लोकमान्यता मिळवून देण्याचे काम आपल्याला करायचे आहे,’ असे त्यांनी सांगितले.

    ‘मामू’ म्हणत किशोरी पेडणेकरांचा फडणवीसांना टोला; उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपवर हल्लाबोल

    ‘देव्हाऱ्यात विठोबासमवेत ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या प्रतिमा टिकाव्यात असे वाटत असेल, तर वेळीच जागे व्हा. तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा, पक्षाचा वा धर्माचा असला तरी दांडा मराठीचा असायला हवा. खांद्यावर पालखी कोणाचीही असली तरी तिचा गोंडा मराठीच असायला हवा,’ असे खडे बोल विश्वास पाटील यांनी सुनावले. ‘महाराष्ट्रात पुस्तकांची केवळ ३६ दुकाने आहेत. वीस जिल्ह्यांत पुस्तकांचे दुकान नाही. बस आणि रेल्वे स्थानकांवर पुस्तक आणि वर्तमानपत्र विक्री दुकानांचे भाडे वाढवून तिथे मिठाईची दुकाने थाटण्यात आली आहेत. ही दुकाने हटवून पुस्तकाची दुकाने सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा