• Sat. Mar 7th, 2026
    Street Dogs : भटके कुत्रे हाकलण्याची जबाबदारीही शिक्षकांवर, शाळेचे आवार श्वानमुक्त करण्याचे नवे काम; शिक्षक संघटनांचा कडाडून विरोध

    School Premises Teachers to Control Stray Dogs : शिक्षकांवर भटके कुत्रे हाकलण्याची जबाबदारी सोपावण्यात आल्याचं एक परिपत्रक काढण्यात आलं आहे. शाळेच्या आवारात हे काम करावं लागणार असून याला शिक्षकांनी कडाडून विरोध केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : आधीच शिक्षणबाह्य कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकांवर आता आणखी एक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता प्रत्येक शाळेत नोडल अधिकारी म्हणून एका शिक्षकाची नेमणूक होणार असून, शाळा परिसर स्वच्छतेसोबतच भटक्या कुत्र्यांचा वावर कमी करण्याची जबाबदारीही त्यांना शिरावर घ्यावी लागणार आहे. याबाबत शिक्षण आयुक्तांनी काढलेल्या पत्रकाचा सर्वच शिक्षक संस्थांनी निषेध केला आहे.

    देशभरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांची आणि त्यांनी माणसांवर केलेल्या हल्ल्यांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण संस्थांचे परिसर स्वच्छ आणि सुरक्षित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रत्येक शैक्षणिक संस्थेने परिसर स्वच्छता व सुरक्षा यांच्यासाठी ‘नोडल अधिकारी’ नेमण्याचे परिपत्रक काढले होते. याच धर्तीवर आता शालेय शिक्षण विभागानेही अशाच आशयाचे परिपत्रक काढले आहे.
    Maharashtra TimesPandharpur News : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराबाबत नवीन वर्षात बदल होणार, येत्या 8 दिवसांत… मंदिर समितीचा महत्त्वाचा निर्णय
    या पत्रात, ‘प्रत्येक शाळेने परिसर स्वच्छता व सुरक्षा यांच्यासाठी शाळेतीलच एका शिक्षकाची नियुक्ती ‘नोडल अधिकारी’ म्हणून करायची आहे. या शिक्षकाची माहिती शाळेच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे लावून स्थानिक महापालिका किंवा संबंधित यंत्रणेला कळवणेही आवश्यक आहे. भटके कुत्रे शाळेच्या आवारात शिरू नयेत किंवा निवाऱ्याला असू नयेत, याची जबाबदारी या शिक्षकाची असेल,’ असे म्हटले आहे.

    ‘राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षकांचे हसे करून ठेवले आहे. एकीकडे शिक्षणमंत्री अशैक्षणिक कामे कमी केल्याची ग्वाही देत असताना दुसऱ्या बाजूला अधिकारी मात्र एकापेक्षा एक अशैक्षणिक कामांना शिक्षकांना जुंपत आहेत. करोना काळात शिक्षकांना दारूच्या दुकानांच्या बाहेरील गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नेमले होते. आता भटके कुत्रे हाकलण्याची जबाबदारी आमच्यावर टाकली जात आहे. हे सरकार आम्हाला बिबट्यांना हुसकावण्यासाठीही दावणीला बांधेल का’, असा प्रश्न मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी विचारला.
    Maharashtra TimesThane News : अवयवदानाने सहा जणांना जीवदान, ठाण्यातील ब्रेन डेड महिलेच्या कुटुंबीयांचा मोठा निर्णय
    या पत्रकाला सर्वच शिक्षक संघटना कडाडून विरोध करत आहेत. शालेय परिसराची स्वच्छता, देखभाल तसेच भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ही कामे महानगरपालिका व संबंधित प्रशासकीय यंत्रणांची जबाबदारी असताना, प्रशासनातील अपयश झाकण्यासाठी शिक्षकांवर शिक्षणाशी संबंधित नसलेल्या जबाबदाऱ्या लादल्या जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी कांबळे यांनी केला.

    ‘बिबट्यांनाही आम्हीच हाकलायचे काय?’

    राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षकांचे हसे करून ठेवले आहे. एकीकडे शिक्षणमंत्री अशैक्षणिक कामे कमी केल्याची ग्वाही देत असताना दुसऱ्या बाजूला अधिकारी मात्र एकापेक्षा एक अशैक्षणिक कामांना शिक्षकांना जुंपत आहेत. करोना काळात शिक्षकांना दारूच्या दुकानांच्या बाहेरील गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नेमले होते. आता भटके कुत्रे हाकलण्याची जबाबदारी आमच्यावर टाकली जात आहे. आता हे सरकार आम्हाला बिबट्यांना हुसकावण्यासाठीही दावणीला बांधेल का’, असा संतप्त प्रश्न मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी विचारला.

    शिर्डीतील कुत्र्यांना मधुमेहासह जडल्या विविध व्याधी, सुस्ती अन् लठ्ठपणाही वाढला, कारण काय?

    तसेच सरकारने हे पत्रक मागे घेतले नाही, तर राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला. ‘वास्तविक भटके कुत्रे हाकलण्याचे किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थांचे आहे. पण राज्यातील शिक्षकांना कोणीच वाली नसल्याने सगळ्या शालाबाह्य कामांची जबाबदारी आमच्यावरच टाकली जाते. या सगळ्या शालाबाह्य कामांसाठी शिक्षकच का दिसतात’, असा प्रश्न राज्य मुख्याध्यापक संघटनेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी विचारला.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा