• Sat. Mar 14th, 2026

    Sharad Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अजब खेळी, एकाच वेळी तीन दगडांवर पाय; सगळीकडेच गोंधळ उडवून दिला!

    Sharad Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अजब खेळी, एकाच वेळी तीन दगडांवर पाय; सगळीकडेच गोंधळ उडवून दिला!

    NCP News: महाविकास आघाडीतील पक्ष आणि मनसे यांच्यातील जागावाटपाचा तिढा उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या तारखेच्या एक दिवस आधीपर्यंत कायम होता.

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अजब खेळी, एकाच वेळी तीन दगडांवर पाय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत जागावाटपाच्या मुद्द्यावरून युती आणि आघाडीत संभ्रमाचे वातावरण असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वेगवगेळ्या ठिकाणी तीन पक्षांशी युती केली आहे. शरद पवार यांनी एकाच वेळी तीन दगडांवर पाय ठेवून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात गोंधळ उडवून दिला आहे.

    समाधानकारक जागावाटप न झाल्याने अनेक महापालिकांमध्ये महायुती आणि आघाडी फिस्कटली आहे. पुणे आणि पिंपरी -चिंचवड महापालिकेत भाजपने युती करण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने या दोन्ही ठिकाणी शरद पवार गटाला सोबत घेतले आहे. मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती केली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परभणी वगळता शरद पवार गटाने काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटासोबतची आघाडी कायम ठेवली.

    ठाण्यात काय घडलं?

    ठाणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसच्या ठाण्यातील नेत्यांनी केल्यानंतर आता शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे संकेत आहेत. या तीन पक्षांतील जागावाटपानुसार ‘उबाठा’ला सर्वाधिक ६२ जागा देण्यात आल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या वाट्याला आलेल्या ४५ जागांपैकी काही जागांवरील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. तर, मनसेला २४ जागा देण्यात आल्याचे समजते. मात्र, मनसेच्या २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

    मुंबईत शेवटच्या क्षणापर्यंत गोंधळ

    मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस मंगळवारी गोंधळ, धावपळीचा ठरला. शेवटच्या दिवसापर्यंत पक्षांमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटींमुळे उमेदवारांना एबी फॉर्म अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधी मिळाल्याने त्यांना अक्षरशः धावत निवडणूक अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठावे लागले. पक्षाकडून अखेरपर्यंत उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांनी अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी या दाखल अर्जांची छाननी होणार असून त्यानंतर पालिकेच्या निवडणूक रिंगणातील उमेदवार ठरतील.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा