• Sun. Mar 8th, 2026
    BJP Shivsena: फडणवीस आणि शिंदेंनी एकत्र येण्याचं ठरवलं, मात्र प्रत्यक्षात वेगळंच चित्र; नेमकं काय घडलं?

    Election News: कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप युतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना शहरात मात्र दोन्ही पक्षांचा वेगवेगळा प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

    सेना-भाजपच्या पहिल्या बैठकीत काय झालं?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकांत सावंत, ठाणे: महापालिका निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना महायुती होणार असल्याचे राज्य पातळीवरून स्पष्ट करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात ठाणे, कल्याण-डोंबिवलीत प्रचारात बेकीचे चित्र दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी डोंबिवलीत ‘निर्धार सभे’च्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडला. तर ठाण्यात ‘नमो भारत, नमो ठाणे’ अशा बॅनरच्या माध्यमातून भाजपनेही स्वतंत्रपणे पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली.

    राज्यातील सत्तेत घटकपक्ष असलेले शिवसेना-भाजप महायुतीद्वारेच लढतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे सातत्याने सांगत असले तरी मुंबई महानगर क्षेत्रातील आठही महापालिकांमध्ये अद्याप जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊन पाच दिवस उलटल्यानंतरही जागावाटपाचे ठोस सूत्र समोर आलेले नसल्याने संभ्रम वाढू लागला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र प्रचाराची सुरुवात करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या महापालिका क्षेत्रातील सभा शुक्रवारी सुरू केल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही जाहीर सभेद्वारे भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये युतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच शहरात दोन्ही पक्षांचा वेगवेगळा प्रचार सुरू असल्याचे चित्र आहे.

    ठाणे शहरामध्ये भाजपने ‘नमो भारत, नमो ठाणे’ असे बॅनर लावून पक्षाचा प्रचार सुरू केला आहे. ठाण्यातील या बॅनरवर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कमळ हे चिन्ह असल्याने ठाण्यात भाजप स्वतंत्र लढणार का, याची चर्चा सुरू झाली होती. परंतु, सायंकाळी भाजपच्या ठाण्यातील जिल्हा कार्यालयामध्ये शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा जागावाटपाची चर्चा सुरू केली. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये महायुतीच्या घोषणेबद्दलची उत्सुकता वाढत आहे. परंतु, दुसरीकडे पक्षाच्या स्वतंत्र प्रचार यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या महापालिका निवडणुकीतील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनीही समाजमाध्यमांवरून ‘नमो भारत, नमो ठाणे’चा नारा दिल्यामुळे दोन्ही पक्षांमधील युती तुटणार की टिकणार, याची चर्चा वाढली आहे.

    एकीकडे चर्चा, दुसरीकडे निर्धार सभा

    भाजपच्या कार्यालयामध्ये शिवसेना-भाजप समन्वय समितीकडून चर्चा सुरू असताना कळवा येथील प्रभागामध्ये शिवसेनेकडून विजयी निर्धार सभेच्या माध्यमातून तेथील उमेदवारांचा प्रचार करण्यात आला. कळवा येथील प्रभाग क्रमांक २३ मधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ घड्याळ चौक येथे शिवसेनेच्या वतीने खासदार श्रीकांत शिंदे यांनी फोडला. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या उमेदवारांसाठी आयोजित या सभेत या प्रभागातील चारही शिवसेनेचे नगरसेवक निवडून देण्याचे आवाहन खा. शिंदे यांनी यावेळी केले. त्यानंतर कळव्यातील आतकोनेश्वर मैदानामध्येही सभा घेऊन या भागात शिवसेनेचा जोरदार प्रचार करून कळव्यातील प्रभागांवर शिवसेनेचा दावा अधिक भक्कम केला.

    ‘सूत्र लवकरच निश्चित’

    शिवसेना-भाजप युतीची तिसरी बैठक शनिवारी वर्तकनगर येथील भाजप कार्यालयात झाली. यावेळी युतीचे जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल, अशी शक्यता होती. परंतु ही बैठकही निष्फळ ठरल्याने कार्यकर्त्यांची धकधक वाढली. मात्र, युतीची सकारात्मक बैठक झाली असून, तीन प्रभागांवर निर्णय होत नसल्याने त्या प्रभागांचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेऊन लवकरच युतीची घोषणा होईल, असे खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.

    ‘युतीची घोषणा पुढील काही तासांत’

    ठाण्यातील १२६ जागांवर भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छा दर्शवली असून जिथे युती होईल, तेथे भाजपकडून उमेदवार दिले जातील. त्यामुळे काही पदाधिकारी नाराज होऊ शकतील, परंतु त्यांचा भविष्यात विचार केला जाईल, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी स्पष्ट केले. तर पुढील काही तासांमध्ये युतीची घोषणा होईल, अशी माहिती भाजप निवडणूक प्रभारी आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा