Balasaheb Thorat: बाळासाहेब थोरात यांनी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे.
रोहित पवारांना टोला लगावला
जामखेड नगरपरिषद निकालानंतर काँग्रेसला ‘बी टीम’ म्हणणाऱ्या रोहित पवार यांच्यावर थोरातांनी अप्रत्यक्ष पण तीव्र टीका केली. आम्ही आधीच सांगितले होते की जामखेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घ्या. तिथे नेतृत्वाविरोधात तीव्र नाराजी होती. विधानसभा निवडणुकीतील नाराजीही होती. निवडणूक लढताना तडजोड करावी लागते, सर्वांना सोबत घ्यावे लागते. हा आग्रह मी केला होता, पण तो मान्य झाला नाही. त्यामुळे काँग्रेसने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न केला,” असे थोरात म्हणाले.
३० वर्षांच्या कष्टांचे फळ
श्रीरामपूर व संगमनेरमध्ये मिळालेले यश हे सध्याच्या प्रचाराचे नाही, तर ३० वर्षांच्या प्रामाणिक कामाचे आहे, असे ठामपणे सांगत थोरातांनी कार्यकर्ते व नागरिकांचे अभिनंदन केले. शहर सुंदर व शांत ठेवण्यासाठी केलेले दीर्घकालीन कामच या विजयामागे आहे. संगमनेरमध्ये काँग्रेसचे चिन्ह वापरले नाही, कारण समविचारी नागरिकांना एकत्र आणायचे होते. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच सर्वांना सोबत घेऊन ही निवडणूक जिंकली, असे त्यांनी नमूद केले. पैशाच्या राजकारणावर टीका करताना ते म्हणाले, प्रामाणिक कष्ट करणाऱ्याला जनता उचलतेच, पण पैसे घेऊनही काही जण मतं खेचून नेतात, तेव्हा खूप दुःख होतं.
Solapur News: बँकेत नोकरी करायची होती, पण नशिबात ‘नगराध्यक्षपद’ होतं; 22 वर्षीय सिद्धीची इनसाईड स्टोरी, आता म्हणते, आमदार होणार….
ठाकरे बंधूंविषयी स्पष्ट भूमिका
मुंबईसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन लढत आहेत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मात्र काही निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीशी चर्चा करूनच घेतले जातील, असे थोरात म्हणाले.
निवडणूक आयोगावर आरोप
निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत थोरातांनी निवडणूक आयोगावर जोरदार ताशेरे ओढले. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचेच ऐकतो, अशी भावना वाढतेय. ऐनवेळी १५ दिवसांनी निवडणूक पुढे ढकलणे, अर्जानंतर अवघ्या चार दिवसांत चिन्ह वाटप, हे चुकीचे निर्णय आहेत. उमेदवार, कार्यकर्ते, नागरिक सगळ्यांना त्रास होतो. निर्णयाविरुद्ध अपीलचीही जागा ठेवली जात नाही. प्रशासनावर नागरिकांचा विश्वास उरलेला नाही,” अशी खंत थोरातांनी यावेळी व्यक्त केली.
‘महायुतीकडून प्रचारासाठी हेलिकॉप्टर…’
महायुतीकडून प्रचंड प्रचार झाला. हेलिकॉप्टर, ये–जा, बॅगा उतरतानाही दिसल्या. आमच्याकडे ना हेलिकॉप्टर ना विमान. तरीही नागरिकांनी आमच्या कामावर आणि विश्वासावर मतदान केलं,असे थोरात म्हणाले.
पुणे–नाशिक रेल्वे मार्गावर प्रश्नचिन्ह
पुणे–नाशिक रेल्वे सरळ जोडायला हवी. मध्ये दुसरीकडे वळवण्याचं कारण कळत नाही. अकोल्याला रेल्वे गेली तर पर्यटन वाढेल, त्याला चालना मिळेल. अकोलेबाबत आमची कोणतीही अडचण नाही, असे थोरातांनी स्पष्ट केले.
