• Sat. Mar 7th, 2026

    Shaktipeeth Expressway: मुंबईलाही जोडणार शक्तीपीठ महामार्ग, विस्तारामुळे होणार 840 किमी लांब; कसा असेल नवा मार्ग?

    Shaktipeeth Expressway: मुंबईलाही जोडणार शक्तीपीठ महामार्ग, विस्तारामुळे होणार 840 किमी लांब; कसा असेल नवा मार्ग?

    Nagpur-Goa Expressway: नागपूर-गोवा शक्तीपीठ दृतगती मार्गात मोठे बदल झाले आहेत. हा मार्ग आता ८४० किमी लांब असून राज्यातील सर्वात लांब दृतगती मार्ग ठरणार आहे.

    नागपूर: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नागपूर–गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाच्या मार्गात महत्त्वाचे बदल केले आहेत. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादग्रस्त प्रकल्पाचा मार्ग बदलण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता नव्या मार्गाची सविस्तर रूपरेषा समोर आली आहे.

    यापूर्वी शक्तीपीठ महामार्ग वार्ध्यातील पावनार येथून गोवा सीमेवरील पत्रादेवीपर्यंत प्रस्तावित होता. हा महामार्ग 803 किमी लांबीचा असून, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित करण्याचा प्रस्ताव होता. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात होता.

    Maharashtra TimesBandra Bridge: मेट्रो-रेल्वे थेट कनेक्टीव्हीटी! 41 कोटींचा खर्च, 278 मीटर लांब; कुठून-कुठे जोडणार हा नवा पादचारी पूल?

    काय आहेत बदल?

    नव्या बदलांनुसार या महामार्गात आता सातारा जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चांडगडमार्गे हा मार्ग पुढे नेण्यात येणार असून, त्यामुळे भविष्यात या द्रुतगती मार्गाला मुंबईशी जोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी वाढून 840 किमी होणार असून, तो राज्यातील सर्वात लांब द्रुतगती महामार्ग ठरणार आहे.

    MSRDCच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी आणि जमीनमालकांकडून सुरू असलेल्या तीव्र विरोधामुळे मार्गात बदल करण्यात आला. सुपीक शेती जमीन नष्ट होणे आणि पर्यावरणीय परिणामांबाबत स्थानिकांनी चिंता व्यक्त केली होती. भूसंपादनाविरोधातील आंदोलनांमुळे हा प्रकल्प वर्षभराहून अधिक काळ रखडला होता. या मुद्द्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत अलीकडील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला भोगावा लागल्याचेही बोलले जाते.

    या बदलांमुळे प्रकल्पाचा खर्च 86 हजार कोटींवरून वाढून सुमारे 90 हजार कोटी रुपये इतका झाला आहे. अंतिम मंजुरीनंतर नव्याने समाविष्ट भागांमध्ये संयुक्त भू-मापन आणि भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. किमान 70 टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

    Chandrashekhar Bawankule यांनी संजय राऊतांचे धंदे काढले आणि ठाकरेंना मिश्किल टोमणेबाजी

    मुंबईला कसा जोडणार?

    शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे जन कल्याण महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. वर्धा ते सांगलीदरम्यान लातूर आणि सोलापूरमार्गे जाणारा सुमारे 442 किमी लांबीचा हा टप्पा, जन कल्याण महामार्ग आणि मुंबई-बार्शी रस्त्याच्या माध्यमातून मुंबईपर्यंत पोहोचण्याचा नवा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. भविष्यात मुंबई महानगर प्रदेशाशी संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी हा द्रुतगती महामार्ग प्रस्तावित विरार-अलिबाग कॉरिडॉरलाही जोडण्याची योजना आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा