• Sun. Jun 14th, 2026
    ठाकरेंच्या आमदारकीचे जेमतेम 5 महिने, विधानपरिषदेत मविआचं संख्याबळ 7 ने घटणार, मोठा फटका बसण्याचे संकेत

    Uddhav Thackeray : २०२६ मध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सात जणांच्या विधान परिषद आमदारकीचा कार्यकाळ संपणार आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : काँग्रेसला रामराम ठोकत प्रज्ञा सातव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर, विधान परिषदेतील काँग्रेस आणि विशेषत: महाविकास आघाडीचे संख्याबळ कमी झाले आहे. यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत काय निर्णय घेतला जातो, याबाबत तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. मात्र नववर्षात परिषदेतील महाविकास आघाडीचे संख्याबळ आणखी कमी होणार असल्याने, ज्येष्ठांच्या सभागृहातही आघाडीला सरकारविरोधात आवाज उठवणे कठीण होणार आहे.

    आगामी वर्षात, २०२६ मध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे राजेश राठोड, अभिजीत वंजारी, जयंत आसगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस शपचे शशिकांत शिंदे आदींचा परिषदेतील कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे नववर्षात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद आणि महाविकास आघाडीचे संख्याबळ हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरणार आहे.

    गांधी घराण्याचे, विशेषत: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दिवगंत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी गुरुवारी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी विधान परिषदेतील सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. विधिमंडळाने सातव यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यासंदर्भातील परिपत्रक गुरुवारी रात्री जाहीर केले. यामुळे विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले. प्रामुख्याने याचा फटका महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळण्यात बसू शकतो, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
    Maharashtra TimesRaj Thackeray : मनसेला डोंबिवलीत गळती, राज ठाकरेंसाठी वहिनी सरसावली, पक्ष संपला असं म्हणणं…
    महाविकास आघाडीसमोर ही नवी चिंता निर्माण झालेली असताना, नववर्षात अनेक आमदारांचा परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ संपणार आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाचे शशिकांत शिंदे यांचा कार्यकाळही याच दिवशी संपत आहे. राष्ट्रवादी शपचे अरुण लाड यांच्या आमदारकीचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी, तर काँग्रेसचे राजेश राठोड यांचाही कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपुष्टात येणार आहे. काँग्रेसचे नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी, यांच्यासह पुणे शिक्षक मतदारसंघाचे काँग्रेसचे जयंत आसगावकर तसेच अपक्ष आमदार किरण सरनाईक यांचाही कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ला संपणार आहे.
    Maharashtra TimesAjit Pawar : हे बघा दादा, या 14 जणांनी ‘घड्याळ’ नाही लावलं, यादी पाहून अजित पवार नाराज, थेट फडणवीसांकडे खंत व्यक्त
    आगामी वर्षात महायुतीच्याही अनेक विधान परिषद आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते पाटील, दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी यांची मुदत १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. तर, सतीश चव्हाण यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपुष्टात येणार आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा