• Sun. Mar 8th, 2026
    Beed Crime : दिवसाढवळ्या तरुणीचं फिल्मी किडनॅप! भररस्त्यात मारहाण अन् कारमध्ये कोंबलं, नागरिकांनी रोखण्याचा…

    बीड शहरात भररस्त्यात एका तरुणीचे अपहरण झाले. दोन तरुणांनी तिला मारहाण करून कारमध्ये जबरदस्तीने कोंबले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुनील जाधव, बीड: शहरातील वर्दळीच्या असलेल्या पंचायत समिती चौकात आज गुरुवारी (दि. १८) दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका तरुणीला भररस्त्यात दोन तरुणांनी मारहाण करत जबरदस्तीने कारमध्ये कोंबून तिचे अपहरण केले. दिवसाढवळ्या घडलेल्या या ‘फिल्मी स्टाईल’ घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पीडित तरुणी आपले कॉलेज संपवून पंचायत समिती जवळील रस्त्याने शास्त्री चौकाकडे पायी जात होती. यावेळी तिथे दबा धरून बसलेल्या दोन तरुणांनी अचानक एका अल्टो कारमधून येत तिचा रस्ता अडवला. काही कळण्याच्या आतच या तरुणांनी तरुणीला उचलून कारमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला.

    तरुणीने यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मोठा प्रतिकार केला आणि आरडाओरडाही केला. मात्र, नराधम आरोपींनी तिला मारहाण करून जबरदस्तीने गाडीत ढकलले आणि गाडी शहागडच्या दिशेने वेगाने पळवून नेली. हा सर्व प्रकार घडत असताना आसपासच्या नागरिकांनी तरुणीचा आवाज ऐकून मदतीसाठी धाव घेतली. काहींनी धाडस दाखवत ती कार अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी कुणालाही न जुमानता गाडी शास्त्री चौकातून राष्ट्रीय महामार्गाकडे वेगाने नेली.

    Maharashtra TimesDharashiv News: धाराशिव हादरलं! कळंब तालुक्यात ३६ वर्षीय तरुणाने भर चौकात जीवन संपवलं, नेमकं काय घडलं?

    पोलिसांची नाकाबंदी

    घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पोलिसांची पथके संशयित अल्टो कारचा पाठलाग करत असून शहागड आणि आसपासच्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन तरुणीची सुटका केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    जनतेमध्ये तीव्र संताप

    भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या अशा धक्कादायक प्रकारे तरुणीचे अपहरण झाल्याने गेवराईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जर वर्दळीच्या ठिकाणी मुली सुरक्षित नसतील, तर सुरक्षित कुठे राहणार? असा सवाल नागरिक विचारत आहेत. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा